फॉलोअर

सोमवार, ५ जून, २०२३

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग ८९

 

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची
संग्राहक ::विनोद जाधव


भाग ८९
सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप - राजकीय संघर्ष
पोस्तसांभार :: मिसळपाव
भाग १
महाराष्ट्राच्या आद्य इतिहासात इथे दंडकारण्य होतं असं मानलं जातं. त्यानंतर काही आदिम जमातींनी वसाहती केल्या. पण लिखित किंवा इतर काही पुराव्यांच्या स्वरूपात इथला त्या काळचा इतिहास फारसा आढळत नाही. महाराष्ट्राचा ज्ञात इतिहास सुरू होतो तो प्रबळ पराक्रमी सातवाहनांपासून.
सातवाहन, भारत देशीच्या विस्तृत भूभागावर सुमारे ४५० ते ५०० वर्षे इतका प्रदीर्घ काळ राज्य केलेली एकमेव भारतीय राजवट, महाराष्ट्राचा आद्य राजवंश. सातवाहनांच्या पूर्वकाळातील अशोकाच्या शिलालेखांत रथिक, भोजक व पेतेनिक यांचे उल्लेख आढळतात पण ते तेव्हढ्यापुरतेच.
सातवाहनांच्या उदयानंतर मात्र त्यांनी खोदवलेल्या गुहा, तत्कालिन शिलालेख, त्यांनी पाडलेली नाणी, इ. पुरातत्वीय पुरावे तसेच गुप्तकाळात निर्माण झालेली पुराणे, हाल सातवाहनाने संकलित केलेली गाथा सप्तशती, गुणाढ्याची बृहत्कथा, शुद्रकाचे मृच्छकटिक यांसारख्या ऐतिहासिक दस्तावेजांमुळे तत्कालिन कालखंडाविषयी बरीचशी माहिती मिळू शकते.
अर्थात सातवाहनांवर काही लिहायचे म्हणजे तो एका मोठ्या लेखमालेचाच विषय होईल. त्यामुळे याविषयी फारसे विस्तारात न जाता सातवाहन आणि त्यांचे परंपरागत शत्रू शक-क्षत्रप यांच्या संघर्षावर काही प्रकाश टाकायचा प्रयत्न करत आहे.
तत्कालीन सातवाहन साम्राज्य नकाशा
कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकाचे मतपरिवर्तन होऊन त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. अशोकाने केलेल्या अतिरेकी धर्मप्रसारामुळे, यज्ञयागावरील व मांसाहारावरील कडक बंधनांमुळे जनतेत असंतोष पसरून त्याचे राज्य बलाढ्य राज्य राजकीयदृष्ट्या बरेच कमजोर झाले होते. अशोकाच्या मृत्युनंतर त्याच्या विशाल साम्राज्याचे तुकडे पडून लहान लहान राज्ये अस्तित्वात आली. अशोकानंतर पन्नास वर्षांच्या अवधीतच मौर्य वंशाची सत्ता संपुष्टात येऊन पुष्यमित्र शुंगाने गादी बळकावली. कलिंग देशात खारवेलाने स्वतंत्र राज्य स्थापन केले तर महाराष्ट्रात रथिक, भोजक, पेतेनिक यांच्यापैकीच कुणी एक असलेल्या सातवाहन नावाच्या वीराने आपले स्वातंत्र्य उद्घोषित करून स्वतःच्या नावाची तांब्या-शिशाची नाणी पाडली व सातवाहन राज्याची मुहूर्तमेढ रोविली. (साधारण इस. पूर्व २३०)याच्या नंतरच्या पिढीचा, बहुधा सातवाहनाचा पुत्र सिमुक (श्रीमुख) सातवाहन गादीवर आला. याच्या कारकिर्दीत सातवाहन राज्य लहानसेच असावे पण याच्या नावाची स्वतंत्र नाणी आहेत. सिमुकानंतर त्याचा पुत्र पहिला सातकर्णी हा अल्पवयीन असल्याने सिमुकाचा भाऊ कण्ह (कृष्ण)हा सातवाहनांच्या गादीवर आला व कण्हानंतर पहिला सातकर्णी हा सातवाहन राजा झाला. कण्हाचे व प्रथम सातकर्णीचे संबंध तणावाचे असून त्याला आपले राज्य कण्हाशी लढूनच मिळवावे लागले असावे असे अभ्यासक मानतात कारण नाणेघाटातल्या प्रतिमा लेखात कण्हाची प्रतिमा दिसत नाही.
ह्या प्रथम सातकर्णीने सातवाहनांचे राज्य मध्यप्रदेशातल्या विदिशा पर्यंत नेऊन भिडवले असावे असे सांची येथील शिलालेखावरून समजते. हा अत्यंत सामर्थ्यवान सातवाहन राजा. याची पत्नी प्रख्यात सातवाहन सम्राज्ञी नागनिका उर्फ नयनिका. प्रथम सातकर्णीच्या काळातच नाणेघाटाची निर्मिती झाली. नाणेघाटाच्या सुरुवातीचीला कड्यात नागनिकेने गुहा खोदविली तेच सातवाहनांचे एकमेव ऐहिक लेणे. सातवाहनांनी केलेले अश्वमेध, राजसूयादिक यज्ञयाग, त्यात केलेला विपुल दानधर्म तसेच सातवाहनांच्या राजेकुलाच्या प्रतिमा व त्याखाली त्यांची नावे इ. उल्लेख त्यात कोरलेले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...