*नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔*
*अग्निदिव्य*
*लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार*
*_______📜⚔🗡भाग - 2⃣9⃣⚔🚩🗡________*
__⚔🚩⚔📜🚩_______*
*हजच्या मार्गाने घियासुद्दीन गेला त्याला बराच काळ उलटून गेला. त्याचे ‘आजारी’ मुरीद आता चांगलेच ‘तंदुरुस्त’ झाले होते. कोणताच उद्योग नसल्याने ते छावणीत उनाडक्या करीत फिरत राहत. अखेर नर्दुल्लाखानाने दटावून त्यांना आळा घातला. छावणीतल्या छावणीत निरोपांची ने-आण करणाऱ्या हरकाऱ्यांच्या कामावर त्यांना नेमले; त्यामुळे छावणीतल्या अंतर्गत बातम्या मिळणे सुलभ झाले.*
* कुलीखानाने संपूर्ण प्रांतात केलेला दौरा चांगलाच लाभदायक ठरला. संपूर्ण अफगाण प्रदेशात त्याचा धाक आणि दबदबा निर्माण झाला. मोगली अधिकाऱ्यांना जसा त्याचा वचक बसला तसेच अफगाण कबिलेवालेसुद्धा वचकून राहू लागले. अर्थातच या वार्ता दिल्लीत पोहोचत होत्याच. तो काबूलला परतला त्यालासुद्धा काही आठवडे लोटले. पण बादशहाकडून ना कुमक आली ना वापसीचे फर्मान. मोगली हिशेबाने आणि अफगाणी प्रदेशाच्या विस्ताराच्या तुलनेत फौज एवढी तोकडी होती की, एकही सेनानी नवे आक्रमण हाती घेण्याची हिंमत करीत नव्हता. आजवर जेवढे मिळविले होते ते राखण्यातच बहुतेक सगळे मनुष्यबळ गुंतून पडले होते. काही ना काही उद्योग काढून कुलीखान फौजेत हालचाल ठेवत असला तरी प्रत्यक्ष लढाईची मोहीम नसल्याने शिपाई कंटाळले होते. लढाईनंतरच्या लूटमारीला मोगली सैनिक चटावला होता. किंबहुना त्याला एक धार्मिक अधिष्ठान असल्याने लूटमार हा त्यांच्या उत्पन्नाचा एक स्रोत होता. तो आटला होता. रयतेला लुबाडण्यावर कुलीखानाने कडक पायबंद घातल्याने त्यांची कुचंबणा होत होती; त्यामुळे फौजेत अस्वस्थता दाटू लागली होती. घरापासून, बायका-मुलांपासून दूर राहावे लागत असल्याने फौज वैतागली होती.*
सरलष्कराच्या दरबारात एके दिवशी कुलीखानाने या विषयाला तोंड फोडले. कुलीखानाने जोशपूर्ण भाषण केले–
ईमानवालो, जनाब महाबतखान सरकारांच्या सोबत मोठी फौज निघून गेली आणि आपण जणू पोरके झालो; त्याला साल उलटून गेले. मध्यंतरी आपण सर्वांनी आम्हाला साथ दिल्यामुळे आपण जे उपाय केले त्यामुळे फौज हालती राहिली. राजधानीतून खजिना कमी आला तरी आपण पैसा उभा केला. फौजेच्या गरजा पुऱ्या केल्या. यामुळे फौज नाराज असली, तरी कुठे बंडाळी झाली नाही. पण मोहीम थंडावल्याने शिपाई जवळपास रिकामाच आहे. रिकामे मन सैतानाचे घर. आलाहजरत आलमपन्हांना आपल्याकडे लक्ष द्यायला फुरसत नाही याचा अर्थ ते दुसऱ्या कोणत्यातरी अतिमहत्त्वाच्या कामात व्यग्र असले पाहिजेत. आपण काहीतरी चमकदार कामगिरी केल्याशिवाय त्यांचे आपल्याकडे लक्ष जाणार नाही. आता असे काहीतरी करून दाखवायचे जे आजपर्यंत सलतनतीत घडले नसेल. आपण अफगाणिस्तानचा बराच मोठा हिस्सा जिंकला हे खरे, पण अजून बरेच जिंकायचे आहे. ते आपण जिंकून घ्यायचे. आता स्वस्थ बसायचे नाही.
एक बुजुर्ग दरबारी मनसबदार कुत्सित स्वरात पण नाटकी विनयाने म्हणाला–
जनाब सरलष्कर म्हणतात ते अगदी बरोबर आहे. काहीतरी केलेच पाहिजे. पण सवाल असा आहे की, कशाच्या भरवशावर? मोहीम करायची तर फौज हवी, तोफा-दारूगोळा हवा, खजिना हवा. मोगली मोहीम म्हणजे काही मरगट्टे चालवतात तशी दरवडेखोरी नव्हे.
अगदी बरोबर. मराठ्यांनी जशा प्रकारे लढाया केल्या आणि प्रदेश मिळवला तसेच लढून आपण प्रदेश मिळवायचा. तशा लढाया कशा लढतात, मी शिकवतो तुम्हाला. त्यासाठी आपल्याकडे असलेली फौज पुरेशी आहे. थोडीबहुत इथल्या पठाणांची भरती करू. मनगटात ताकद आणि हौसला बुलंद असला तर तोफांची आणि बंदुकांची काहीच गरज नसते. रही बात खजाने की। जनानखान्यांचा आणि बाजारबुणग्यांचा छावणीवर पडणारा बोजा दूर झाल्याने आपले खर्च आटोक्यात आले आहेत. शिपायांना तनख्वाह सुरूच आहे. वेगळा तनख्वाह देण्याची गरज नाही; तसेच ते गनीमतमधून कमावतील ते वेगळेच. त्याशिवाय आपण व्यापाऱ्यांकडून भरपूर कमावतो आहोत. त्यातून बरीच शिल्लक जमली आहे. शिवाय इथली रयत आता सलतनतीची रयत आहे. तिच्याकडून थोडा कर आणि सारा वसूल करू. हिंमत, बुद्धी, युक्ती आणि ताकद यांचा आत्मविश्वासाने योग्य उपयोग केला की काहीच अशक्य होत नाही. सुलताने आली मरहूम हजरत बाबर सरजमीन-ए-हिंदमध्ये लाखांची फौज आणि पेटारे भरून सोने घेऊन आले नव्हते.
नवीन तडफदार तरुण सरदारांमध्ये कुलीखानाचे वक्तव्य ऐकून मोठा उत्साह संचारला. एकामागोमाग एक तरुण सरदार तडफदार बोलून सरलष्करांचे म्हणणे उचलून धरू लागला. मात्र चैनबाजीची चटक लागलेले काही खुशालचेंडू बुजुर्ग सरदार कुरकुर करू लागले. त्यांनी अनेक खुसपटे काढली. पण तरुण सरदारांनी त्यांना परस्परच उत्तरे दिली. अखेर कुलीखानाची योजना यशस्वी करून दाखवायची आणि आलाहजरतांना चकित करायचे, असा सर्वांनी उत्साहाने निर्णय घेतला. इतका वेळ शांतपणे उभा राहून सर्व चर्चा ऐकत असलेला गुलाम हैदर गंभीरपणे म्हणाला–
जनाबे आली, जान की अमान पाऊं तो कुछ अर्ज करूं…
अजी आपल्यासारख्या तजुर्बेकार बुजुर्गांच्या मशवऱ्यांची आम्हाला नेहमीच गरज असते. बोला. फक्त एक सूचना की, तरुणांना नाउमेद करू नका.
अजिबात नाही. जनाबे आली जे करू म्हणत आहेत ते सलतनतीच्या भल्याचेच आहे. फौजेच्या कल्याणाचे आहे यात संशय नाही. मात्र माझा इतक्या पिढ्यांचा तजुर्बा सांगतो आहे की, जल्दबाजी नको. दरबारातील काही मोजक्या लोकांचे ऐकून संशयाचे भूत दरबारात थैमान घालताना मी पाहिले आहे. केवळ गैरसमजामुळे वफादारांचे रक्त सांडलेले मी बघितले आहे. अनेक इमानदारांचे संसार बरबाद झाले आहेत. माझी जनाबे आलींना विनंती आहे, त्यांनी या मोहिमेसाठी आलमपन्हांची रजामंदी घ्यावी. अन्यथा जनाबे आलींचे दुश्मन ही बंडखोरी, बगावत आहे म्हणून आलाहजरतांचे कान भरतील आणि अनर्थ ओढवेल. आलाहजरतांनी सख्ख्या भावांची गुस्ताखी बख्शली नाही. आपण तर अखेर गुलाम. बस्स एवढेच. याउपर जनाबे आलींचा हर हुक्म सर आँखोंपर.
तो सबुरीचा सल्ला मात्र सर्वांना पटला. कुलीखानाने पत्र लिहिण्यासाठी आवर्जून गुलाम हैदरची मदत घेतली आणि अत्यंत काळजीपूर्वक, तोलूनमापून शब्द वापरून पत्र तयार केले आणि सरलष्कराच्या सही-शिक्क्याने खुद्द बादशहाच्याच नावे पत्र रवाना झाले. पत्राचे उत्तर येण्यासाठी साडेतीन-चार महिन्यांचा काळ लागणार होता. पण तेवढा वेळ नुसतेच बसून न राहता कुलीखानाने नव्या मोहिमेची जंगी तयारी सुरू केली.
-
-
महाराजांना जाग आली तेव्हा पूर्वा नुकतीच उजळत होती. करदर्शन करून त्यांनी उजळत्या पूर्वेला नमस्कार केला आणि ते पलंगावरून खाली उतरले. त्यांची चाहूल लागून दारावरचा हुजऱ्या लगबगीने आत आला. मुजरा घालून खालमानेने म्हणाला–
रामराम मायबाप. म्हाराज रामपारी तकलीप देतुया मापी असावी. पर भल्या पाटंच सरदरवाजास्नं माणूस आल्ता. कोनी बामन सासवडच्या अंजिराची परडी आत्ताच आपल्या सुपुर्द करायची हाय म्हनून रातभर तटाभाईर ताटकळत बसलाया. लईच जिद करतुया, ऐकना झालाय. त्येचं काय करावं म्हनून हवालदार इचारतुया.
का? थेट आमचा सल्ला का घ्यावा वाटला? किल्लेदाराच्या कानी ही गोष्ट का घातली नाही?
किल्लेदार सरकारास्नी रातीलाच कळवलया पर ते म्हनलं रातच्याला गडाचे दरवाजे आपल्या हुकमाबिगर उगडत न्हाईत. दरवाजावरून राऊत आल्ता तवा मध्यान रात झाल्ती. आपला डोळा लागला व्हता म्हनून नींद खराब क्येली न्हाई.
उत्तम! छान! चांगली अक्कल चालवलीत. आत्ता या क्षणी असेच सुटा आणि किल्लेदार सूर्याजी पिसाळांना हुजूर दाखल होण्यास हुकूम झाला म्हणून सांगावा द्या. म्हणावे, असाल तसे दाखल व्हा. पोशाख करण्यात वेळ दवडू नका. दातवण करीत असाल तर चूळ वाड्यावर येऊन भरा. आमचे दातवणादी विधी आटोपण्याच्या आत किल्लेदार या इथे आमच्या महालात दाखल झाले पाहिजेत. समजले? हवालदारास हुकूम द्या, त्या ब्राह्मणास सन्मानाने पाचाडच्या वाड्यात न्या. त्यांस म्हणावे, आन्हिके उरकून आमच्या खासगीच्या दालनात बसावे. घटकाभरात आम्ही पोहोचतो आहोत. वाड्यावर कारभाऱ्यांस वर्दी द्या; आम्ही स्नान-पूजा तेथेच करू. आता निघा. तोंडाकडे काय पाहत बसलात?
जी, महाराज…
गडबडीने मुजरा घालून हुजऱ्या पळतच बाहेर पडला. महाराजांचे शौच-मुखमार्जन आटोपण्याच्या आत किल्लेदार सूर्याजी पिसाळ हुजूर दाखल झाले. खरोखरच ते फक्त धोतर आणि पैरणीवर होते. महाराजांसमोर बोडक्याने उभे राहणे शक्य नव्हते म्हणून एक पंचा मुंडाशासारखा डोक्याला गुंडाळला होता. अशा प्रकारे बोलावणे म्हणजे कंबख्तीच, हे माहीत असल्याने त्याचे पाय लटपटत होते, मुजरा घालणारे हात थरथरत होते. महाराजांच्या क्रुद्ध चेहऱ्याकडे नजर टाकण्याची हिंमत नव्हती तिथे नजर भिडविणे कुठले जमायला?
या किल्लेदार. खास तख्ताच्या गडाची किल्लेदारी आम्ही तुम्हावर सोपवली ती या विचाराने की, तुम्हापाशी काही विशेष योग्यता आहे. पण तुम्ही तर हुजऱ्यापेक्षा सांगकामे निघालात. तुम्हास खास हिदायत देऊन ठेवलेली आहे की, सासवडचे अंजीर घेऊन येणारास दिवसाच्या कोणत्याही क्षणी, आम्ही जेथे असू तेथे आम्हासमोर दाखल करावे. याचा अर्थ आणि महत्त्व तुमच्यासारख्या विश्वासू म्हणवणाऱ्या अनुभवी मानकऱ्यांस उमगू नये? आश्चर्य!!
क्षमा महाराज. पण काल महाराजांना ज्वर होता असे कळले. म्हणून मध्यान रात्री तकलीफ दिली नाही.
अस्सं? स्वराज्याच्या काजापुढे आमच्या निद्रेची मातब्बरी कधीपासून धरू लागलात?
क्षमा महाराज, पण रात्री-अपरात्री आपणांस त्रास देऊ नये असा महाराणी सरकारांचा हुकूम आहे.
त्यापायी त्या गरीब ब्राह्मणास भरथंडीत रात्रभर तटाबाहेर ताटकळवलेत? त्या ब्राह्मणाने दिलेल्या निरोपाचा मथितार्थ तुम्हाला कळला नाही असे आता वर सांगू नका. मुलाहिजा राखला जाणार नाही. निरोप मिळताच सरदरवाजावर का गेला नाहीत? ठीक आहे, या गफलतीचा फैसला आम्ही सवडीने करू. आत्ता असेच त्या ब्राह्मणास घेऊन पाचाडास जा. हवालदार आमचा हुकूम तुम्हाला कळवेलच. पाचाडास आमची वाट पाहा. अनुमतीशिवाय वाडा सोडू नका. जसे आहात तसेच आत्ता इथूनच निघा. आमची मुलाकात होईल तोपर्यंत तुम्ही चाकर कोणाचे, स्वराज्याचे की महाराणी सरकारांचे हे मनाशी आठवून ठेवा. या.
आज्ञा.
थरथरत्या पावलांनी सूर्याजी महालाबाहेर पडला. महाराजांनी तातडीने आपल्या विश्वासू हुजऱ्यांच्या हस्ते मोरोपंत, अनाजी दत्तो वगैरे कारभारी मंडळींना सकाळच्या दरबारातील कामासंदर्भात सूचना धाडल्या. दुपारचा खाना पाचाडास घेणार असल्याची वर्दी दारुणी महालात रवाना केली. त्यानंतर जुजबी पोशाख करून ते लगबगीने वाड्याबाहेर पडले. पाचाडाच्या वाड्यावर पोहोचताच मुजऱ्यांकडे दुर्लक्ष करीत ते तडक आपल्या दालनाकडे निघाले. देवडीवर तिष्ठत बसलेल्या सूर्याजीकडे त्यांनी फक्त एक कटाक्ष टाकला. दालनात एक शुचिर्भूत ब्राह्मण हातात फळांची करंडी सांभाळीत तोंडाने देवाचे पुटपुटत तिष्ठत होता. महाराजांचे पाऊल दालनात पडताच मुजरा करून तो सस्मित मुद्रेने महाराजांकडे पाहत उभा राहिला. खिडकीतून येणारे कोवळे ऊन त्याच्या चेहऱ्याच्या प्रसन्नतेत अधिकच भर घालत होते. बैठकीवर बसत महाराज म्हणाले–
या मथुरे गुरुजी. बरीच लांबची मजल मारून आलात. आपली प्रसन्न, आनंदी मुद्रा पाहिली आणि आमचा जीव भांड्यात पडला. म्हटले आपण एवढी रात्र करून गडावर आलात, कोणती तातडीची खबर घेऊन आलात न कळे. सांगा, कोणती वार्ता आणलीत?
महाराज, वर्तमान शुभ आहे. हे तर आपण ताडलेच आहे. तितकेच ते तातडीचेसुद्धा आहे. नाईकांनी अगदी बजावून सांगितले आहे की, फळांची करंडी अतिशय मूल्यवान फळांनी भरलेली आहे. कितीही रात्र झाली तरी आपल्या सुपुर्द केल्याशिवाय उसंत घेऊ नये. अंजीर फळ मोठे नाजूक. एकदा पिकले की फार लवकर नासून जाते. म्हणून तातडी करणे निकडीचे होते.
सूचक हसत मथुरे गुरुजींनी परडी महाराजांसमोर तिवईवर ठेवली. परडीत हात घालून पाचोळ्याखाली दडविलेला कागद त्यांनी काढून हातात घेतला! अधीर नजरेने झरझर ते कागद वाचू लागले. त्यांच्या मुखावरची प्रसन्नता क्षणोक्षणी वाढू लागली. मान संतोषाने डोलू लागली. पत्र वाचून संपताच त्यांनी मथुरे गुरुजींकडे प्रसन्न कटाक्ष टाकला. काही क्षण नजर खिडकीबाहेर वळविली. मग पुन्हा एकदा सावकाशपणे सारे पत्र वाचून काढले. मग पत्राचा कागद काळजीपूर्वक उशीखाली ठेवून दिला.
सांगा मथुरे गुरुजी, काय खबर आमच्या नाईकांची?
महाराज, पत्रात सारे सविस्तर लिहिलेले आहेच. इतक्या वर्षांनंतर का होईना नेताजीरावांना संपर्क साधण्याचा मार्ग गवसला. आता नियमितपणे खबरा येण्यास सुरुवात व्हावी अशी आशा ईश्वरकृपेने उत्पन्न झाली आहे. नाईकांनी खास कळवण्यास सांगितले आहे की, आपला नजरबाज आफताबखान यानेच मोठ्या हिकमतीने हा मार्ग शोधून काढला आहे.
अरे व्वा! छान! आणखी काही?
त्यानंतर मथुरे गुरुजींनी नेताजीरावांनी अवलंबिलेले कडक धोरण, पैसा उभा करण्यासाठी योजलेले अनेक मार्ग, ठाण्यांना दिलेल्या भेटी, फौजेत मिळविलेली लोकप्रियता, सर्वसामान्य शिपाई, तरुण सरदार इत्यादींमध्ये मिळविलेले प्रेम, बुजुर्गांमध्ये उत्पन्न केलेला धाक आणि स्थानिक जमीनदार-रयतेत निर्माण केलेला दबदबा या साऱ्यांचे तपशीलवार आणि रसभरित पण वास्तव वर्णन महाराजांना ऐकवले. महाराज अत्यंत समाधान पावले. ऐकत असताना सारा वेळ महाराज डोळे मिटून बसून होते. त्यांनी मध्ये एकही शब्द विचारला नाही. जिरेटोपातील मोत्यांचा घोस मंदपणे डुलत होता.
जगदंब! जगदंब!! गुरुजी भल्या सकाळी आपली भेट झाली, सुवार्ता घेऊन आलात; ही सारी आई जगदंबेची कृपा. तुम्ही आमच्या मनावरचा फार मोठा भार हलका केला आहे. फार लांबची मजल मारून आला आहात. आता चार दिवस विश्राम करा. आम्ही सूर्याजींना सूचना देतो, ते आपली व्यवस्था करतील. आम्ही नाईकांसाठी पत्र तयार करतो, ते घेऊनच गड उतरावा. या आता. रात्रभर आपल्याला थंडीत कुडकुडत ताटकळावे लागले, यासाठी आम्ही दिलगीर आहोत.
स्वामी, त्यासाठी आपण कष्टी होऊ नये. चाकराने असे कष्ट सहन करणे हे त्यांचे कर्तव्यच असते. निष्ठांचे पीळ त्यातूनच घट्ट होतात. कल्याणमस्तु।
तोंडभर आशीर्वाद देऊन मथुरे गुरुजी बाहेर पडले आणि महाराजांनी सूर्याजी पिसाळांना बोलावून घेतले. पारोशा तोंडाने, उघड्याबोडक्याने धावपळ करून आणि बराच वेळ देवडीवर बसून, वाट पाहून सूर्याजी अगदी कानकोंडा होऊन गेला होता. पण महाराजांची प्रसन्न, हसरी मुद्रा पाहून थोडा त्याच्या जिवात जीव आला.
या किल्लेदार. नशीब जोरावर आहे तुमचे, वार्ता शुभंकर - आनंदाची होती म्हणून बचावलात; आता आम्हास आमचे तोंड विटाळायचे नाही. पण ध्यानात ठेवा, थेट आमच्याशी बांधलेले नजरबाज कोणाही कारणाने खोळंबता कामा नयेत. राजकारणाचे अनेक नाजूक गुंते त्यांच्या बातम्यांमध्ये गुंतलेले असतात. थोडा उशीरसुद्धा कोणाच्या प्राणावर बेतू शकतो किंवा स्वराज्याचा घात करू शकतो. नेताजीकाकांना उशीर झाला त्याचे काय परिणाम स्वराज्य भोगतेय ते बघताय ना? या खेपेला आम्ही आनंदात आहोत म्हणून माफी देत आहोत, पण पुन्हा अशी गफलत झाली तर किल्लेदारीचा मुलाहिजा राखला जाणार नाही. असो. मथुरे गुरुजी काही दिवस गडावर मुक्कामास राहतील. त्यांची उत्तम बडदास्त राखली गेली पाहिजे. रोज मिष्टान्न व्यवस्था करा.
आज्ञा.
मुजरा घालीत, पाठ न दाखविता सूर्याजी दारापर्यंत गेला तेवढ्यात महाराजांनी त्याला हाकारून पुन्हा बोलावले.
हं, ऐका. आणखी एक महत्त्वाचे. एक गोष्ट नीट गाठी बांधून ठेवा. दारुणी महालातील असे हुकूम महालाच्या उंबरठ्याच्या आतच ठेवायचे. त्यांची ढवळाढवळ सदरेपर्यंत पोहोचू द्यायची नाही. अशा हुकमांची लुडबुड जर स्वराज्याच्या कारभारात होऊ लागली तर फार मोठी दुरवस्था ओढवेल. सुज्ञ आहात, अधिक उघड करून सांगणे नको. बरे, असेच उघडेबोडके गडावर परतू नका. दिवस वर आला आहे. राबता सुरू झाला असेल. निष्कारण बभ्रा नको. वाड्यावरच स्नान उरका. आमच्या कपडेपटातून पोशाख देण्याची सूचना आम्ही कोठावळ्यांस देतो. तयार होऊन निघा. मथुरे गुरुजी थांबतील थोडा वेळ.
महाराजांचे मनमोकळे मिस्कील बोलणे ऐकून सूर्याजीचा धीर चेपला आणि त्याच्या मुद्रेवर हास्य उमटले. हसत हसत मुजरा करून तो बाहेर पडला.
महाबतखान दिल्लीत परतला आणि मागोमाग तक्रारींच्या पत्रांचा महापूर उसळला. महाबतखानास नर्दुल्लाखानाकडून येणारी ‘अधिकृत’ / ‘गुप्त’ वार्तापत्रे आणि वजीर जाफरखानास सिद्दी फुलादखानामार्फत मिळणारे सिद्दी आफताबखानाचे खलिते यांची भर वेगळीच! एकच बातमी. वेगवेगळ्या मनोवृत्तीतून आणि हितसंबंधांतून वेगवेगळे आकार-विकार घेऊन येत होती. कुलीखानाने छावणीतून जनानखान्याचे केलेले उच्चाटन, त्यांची पेशावरला केलेली रवानगी, जनानखान्याचा खर्च ज्याचा त्याने करण्याची सक्ती, त्यावर पूर्वी सरकारातून झालेल्या खर्चाची सक्तीने केलेली वसुली, फौजेची प्रत्यक्ष शिरगणती, शिपायांना सुविधा पुरवून त्यांचे चालविलेले लाड, सामान्य शिपायांशी त्याचा थेट संपर्क, सैन्यात त्याला मिळणारी लोकप्रियता, सैन्याच्या तुकड्यांच्या सततच्या बदल्या, निर्माण केलेली नवनवी उत्पन्नाची साधने, टपाल व्यवस्थेतल्या सुधारणा अशा एकापेक्षा एक अचंबित करणाऱ्या बातम्या राजधानीत पोहोचत होत्या. अनेक शतकांच्या मुघलशाहीत असे अक्रीतघडलेले ना कोणी पाहिले, ना ऐकले.
उमराव आणि दरबाऱ्यांमध्ये अस्वस्थ चर्चा सुरू झाली होती. महाबतखानाचा जामीन अडकला असल्याने त्याचा जीव टांगणीला लागला. तो आणि जाफरखान त्यांच्या परीने प्रत्येक लहान-मोठी खबर बादशहाच्या कानावर घालीत होते. बादशहा ऐकून घेत होता पण त्याच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया येत नव्हती. दोन्ही खान पुरते परेशान होऊन गेले. हे सारे कमी पडले म्हणून की काय, कुलीखानाने संपूर्ण अफगाणिस्तानात काढलेल्या झंझावाती दौऱ्याच्या, त्याने नैर्ऋत्य सीमेवरच्या अफगाण-इराण सीमाभागातील रानटी लोकांची वस्ती असलेल्या विराण प्रदेशाला दिलेल्या भेटीच्या आणि त्याने स्थानिक जमीनदार आणि कबिल्याच्या सरदारांबरोबर सुरू केलेल्या संवादाच्या बातम्या धडाधड येऊन कोसळल्या. महाबतखानाच्या पायाखालची वाळूच सरकली. तो उठला आणि थेट वजीर जाफरखानाच्या समोर दाखल झाला. त्याच खबरींनी भरलेल्या खलित्यांचा ढीग समोर घेऊन तो सचिंत बसून होता. त्याची तर मतीच गुंग झाली होती. अत्यंत चिंताक्रांत होऊन दोघांनी प्रदीर्घ चर्चा केली. एकच मुद्दा दोघे एकमेकांना वेगवेगळ्या शब्दांत पटवून देत राहिले. दोन-अडीच घटकांचा काथ्याकूट झाल्यानंतर मात्र दोघांचे एकमत झाले. दोघांनाही मनोमन पटले की, ही बाब अत्यंत गंभीर असल्याने बादशहाच्या कानी घातलीच पाहिजे. ताबडतोब आत्ताच्या आत्ता.
दोघेही उठले आणि पालख्यांमध्ये बसून बादशहाकडे निघाले. बादशहा आपल्या जनानखान्याच्या महालात बसला होता. वर्दी पाठवून दोघे सदर महालात बसले. वास्तविक बादशहा जनानखान्याच्या आणि कौटुंबिक बाबींमध्ये फारसा गुंतत नसे. जनानखान्याची पूर्ण अखत्यारी त्याने रोशनआरा बेगमेवर सोपवली होती. मात्र धाकटा शहजादा अकबर, बादशहाच्या चिंतेचा विषय होऊन बसला होता. आईवेगळे पोर म्हणून तो जरा जास्तच लाडावला होता. त्याला वळण लावण्यासाठी म्हणून झेबुन्निसा बेगमेच्या देखरेखीखाली ठेवले होते. त्याच्याच विषयी काही खल चालू होता. आधी तर, बादशहाने वर्दीकडे दुर्लक्ष करून आपले काम तसेच सुरू ठेवले. जसजसा भेटीस उशीर होऊ लागला तसतसे दोन्ही उमराव अस्वस्थ होऊ लागले. अखेर त्यांनी देवडीवरच्या खोजांच्या दरोग्यालाच तातडीची वर्दी देऊन पाठविले. खुद्द दरोगा वर्दी घेऊन आला म्हटल्यावर बादशहाला दखल घेणे भाग पडले. त्यातच महाबतखानासारखा मातब्बर उमराव खुद्द वजीर जाफरखानाला सोबत घेऊन काबूलच्या मसलतीसंबंधाने भेट मागतो म्हणजे निश्चितच काही तातडीची बाब असली पाहिजे हे ओळखून त्याने आपले काम आवरते घेतले आणि बेगमांना निरोप दिला. त्याने दोन्ही उमरावांस जनानखान्यातच भेटीस बोलावले. दोघे आधीच तणावात होते. शाही जनानखान्याच्या अंतर्भागात जायचे म्हणून त्यांना अधिकच दडपण आले. ताणलेल्या चेहऱ्याने कुर्निसात करत महालात शिरणाऱ्या त्या दुकलीवर बादशहाची प्रश्नार्थक गहिरी हिरवी नजर खिळली होती. दरबारी रिवाजाला अनुसरून बोलण्याची सुरुवात अर्थातच जाफरखानाने केली.
आलमपन्हांच्या विश्रांतीमध्ये खलल आणल्याबद्दल गुलाम माफी चाहतो. पण आलमपन्हा, महम्मद कुलीखानाचे कारनामे दिवसेंदिवस नवनवीन काळज्या उत्पन्न करीत आहेत.
जी आलाहजरत, हम भी वजीरेआझम की बातों से इत्तफाक रखते हैं.
प्रश्नार्थक नजर जास्तच गहिरी झाली. आपला खास माणूस नर्दुल्लाखानाच्या खलित्यामधील वेचक भाग महाबतखानाने बादशहास वाचून दाखविला आणि महम्मद कुलीखानासंबंधीचा सारा तपशील अगदी तिखटमीठ लावून सांगितला. मध्ये मध्ये वजीर जाफरखान आपल्या ‘विश्वासू’ सूत्रांचा हवाला देत मसाला पेरत गेला. अत्यंत निर्विकार चेहऱ्याने बादशहा ऐकत होता. दोघांचे बोलणे संपले तरी बादशहाच्या चेहऱ्यावर कोणतीच प्रतिक्रिया उमटली नाही. तो निर्विकार दगडी चेहरा पाहून दोघेही मुत्सद्दी गांगरून गेले. न राहवून जाफरखान म्हणाला–
आलमपन्हा, कुलीखानाला आळा घालण्याची वेळ आली आहे. गुलामाला असे साफ दिसते आहे की, पाणी डोक्यावरून जाण्याची वेळ येण्याच्या आधीच बांध घालणे जरुरीचे आहे. महम्मद कुलीखानावर जरब बसवू शकेल असा कोणी काबील आणि विश्वासू दरबारी तातडीने अफगाणिस्तानात पाठवला पाहिजे.
वजिराचे शब्द ऐकताच कपाळाला आठ्या घालीत महाबतखानाने चमकून त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहिले. ही बारीकशी हरकतसुद्धा हिरव्या नजरेने टिपली. दातांच्या फटीतून तीव्र पण थंड शब्द बाहेर आले–
अस्सं? असा कोण आहे तुझ्या नजरेत? तू स्वत:च सिफारिश करून महाबतखानास माघारी बोलावून घेतलेस. त्याने माबदौलतांना जामीनकी लिहून दिली आहे. कुलीखानाची खातरजमा दिली आहे. क्यों महाबतखान?
महाबतखानाच्या पायाखालची जमीनच खचली. आता लोढणे उलट फिरून त्याच्याच गळ्यात येऊन पडू पाहत होते. प्रकरण फार ताणले तर त्याचा जीव आणि दौलत दोन्ही धोक्यात आले असते. लाचार हसत तो गडबडीने म्हणाला–
अलबत. आलमपन्हा, बंद्याचे वचन आलाहजरतांच्या पायाशी गुंतले आहे. मी परत निघालो तेव्हा मला खात्री पटली होती की, त्याच्या मनात बगावत-बंडखोरी करण्याचा वा पळून जाण्याचा विचार उरलेला नाही. आतासुद्धा ज्या खबरी येत आहेत त्या पाहता तो असला काही अविचार करीत असल्याचे दिसत नाही. तख्ताशी बेइमानी करण्याच्या वा पळून जाण्याच्या तो योजना आखत असावा अशी कोणतीही खबर अद्याप नाही. हां तो जरा नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने, मोगली रिवाजास नव्या असलेल्या पद्धतीने, जरा स्वतंत्र वृत्तीने वागतो आहे एवढे खरे; त्याला फक्त नकल घालणे जरूर आहे इतकेच.
महाबतखानाने परतवार करीत मारलेली कोलांटी उडी पाहून जाफरखान चाट पडला. डोळे फाडून तो त्याच्याकडे पाहत राहिला. काय बोलावे त्याला सुचेना. त्याच्याऐवजी बादशहाच म्हणाला–
जर एवढेच आहे तर मग एवढा बेताब होऊन का धावत आलास; तेसुद्धा थेट शाही जनानखान्यात?
गुस्ताखी माफ आलमपन्हा, पण गुलामाच्या दिलोदिमागमध्ये दौलतीच्या आणि तख्ताच्या कल्याणाशिवाय कोणताच खयाल नसतो. नोकर त्यातून फौजबंद सिपाहसालार वाजवीपेक्षा जास्त स्वातंत्र्य घेण्याचा प्रयत्न करू लागला, तर त्याला वेळीच अटकाव करवावा यासाठी आम्ही हजरतांच्या कदमांशी आलो आहोत.
मग? माबदौलतांनी काय करावे असा तुमचा मशवरा आहे?
आलमपन्हा कुलमुखत्यार आहेत. सर्वज्ञ आहेत. गुलामाच्या मर्यादित बुद्धीला जे जाणवते ते पायाशी रुजू आहे. गुलामाला असे प्रामाणिकपणे वाटते की, आलाहजरतांनी ज्या मकसदसाठी कुलीखानाला जिवंत ठेवले, इस्लामच्या नेक राहवर आणले तो मकसद त्याला इतक्या दूरवर एकटे ठेवण्याने पुरा होणार नाही. आता योग्य वेळ पाहून आलमपन्हांनी कुलीखानाला आपल्या पायाशी बोलावून घ्यावे आणि नजरेखाली ठेवावे.
आपला पायगुंता सोडवून घेण्याची महाबतखानाची धडपड पाहून जाफरखान चकित झाला. बादशहाच्या गंभीर दगडी चेहऱ्यावर किंचित स्मित उमटून गेले असावे अशीसुद्धा त्याला शंका आली.
वजीरेआझम, तुमचा मशवरा काय आहे?
एक डोळा महाबतखानावर ठेवत तो हळूच पुटपुटला-
गुलाम जनाब महाबतखान साहब की राय से इत्तफाक रखता है.
महाबतखानाची डोलती नय्या सावरणे भाग होते. तो त्याचा जवळचा रिश्तेदार होता. इराणी दरबाऱ्यांत त्याचे मोठे वजन होते.
बेहतर है। मामले की पूरी तफतीश हो। कुलीखान के इस बर्ताव का मकसद मालूम किया जाय। अन्यथा महाबतखानास अफगाणिस्तानात वापस जाणे भाग आहे. ते रवाना झाले तर त्यांचा जनानखाना माबदौलत आपल्या पनाहमध्ये ठेवतील.
आंबलेल्या दातांनी दोघे शाही जनानखान्यातून बाहेर पडले आणि आपापल्या मुक्कामावर रवाना झाले. त्याच दिवशी दोघांचे सांडणीस्वार आपापल्या माणसांसाठी कडक खलिते घेऊन काबूलकडे दौडत निघाले. महाबतखानाचे नशीब जोरावर होते. या प्रसंगाला जेमतेम पंधरवडा झाला असेल-नसेल आणि महम्मद कुलीखानाचे दस्तूरखुद्द आलमपन्हा जिल्हेसुभानी बादशहा सलामतांच्या नावे लिहिलेले पत्र राजधानीत येऊन दाखल झाले.
महम्मद कुलीखानाचे थेट बादशहाला लिहिलेले पत्र म्हटल्यावर बादशहाने दरबारात पत्र वाचण्यास मना केले. याचा अर्थ ते पत्र खासगीत - बादशहाच्या महालात निवडक मुत्सद्दी दरबाऱ्यांच्या समोर वाचले जाणार होते. रात्री बादशहाच्या खासगी महालात मुख्य वजीर जाफरखान, मीर बक्षी, सरलष्कर महाबतखान, दाऊदखान कुरेशी, दानिशमंद खान आणि काही महत्त्वाची मोजकी मंडळी हजर झाली. दरबारी पोशाख उतरवून बादशहाने साहेबी लिबास, म्हणजे साधी सुती लुंगी, सैलसर अंगरखा आणि स्वत:च्या हाताने विणलेली गोल टोपी असा साधा पोशाख परिधान केला होता. तो एका साध्या मसनदीवर पालथी मांडी घालून बसला होता. हात टोपी विणण्यात व्यग्र होते. पण गहिरी हिरवी नजर समोरच्या प्रत्येकाचा वेध घेत होती. सलाम-दुव्याचे प्राथमिक उपचार आटोपून मानकरी हात बांधून समोर उभे राहिले.
खैर. वजीरेआझम, सुनाईये, क्या कहता है तुम्हारा महम्मद कुलीखान.
कुर्निसात करून जाफरखानाने समोरच्या तिवईवर ठेवलेली किनखापाची हिरवी मखमली थैली उचलली. सरफास ओढून त्यातून अतिशय सुंदर कोरीवकाम केलेले व त्यात अधूनमधून किमती खडे जडवलेले अक्रोडाच्या लाकडाचे पत्राचे नळकांडे बाहेर काढले. त्यातून तशाच प्रकारचे कोरीवकाम केलेल्या लाकडी दांडीवर गुंडाळलेले पत्र काढून उलगडले. अस्सल रेशमी कापडावर सुंदर रंगीबेरंगी नक्षीदार वेलबुट्टीच्या चौकटीत घोटीव फारसी अक्षरांत पत्र लिहिले होते. ते पत्र उलगडताच कस्तूरी आणि हीनाचा वास महालभर दरवळला. पत्राच्या शिरोभागी फौजेच्या सरलष्कराचा पाचबुर्जी शिक्का झळकत होता. पत्र भले लांबलचक होते. वजिराने पत्र उलगडताच खोजाने दिव्याची ठाणवई पत्रावर नीट उजेड पडेल अशा पद्धतीने आणून ठेवली आणि तो पावले न वाजविता निघून गेला. वजिराने बादशहाकडे एक कटाक्ष टाकला. नजरेचा इशारा मिळाल्यावर त्याने धीरगंभीर आवाजात पत्र वाचण्यास सुरुवात केली.
आलमपन्हा, जिल्हेसुभानी, शहनशाहे आलम बादशाहे हिंदोस्तान, हुजुरे आली आलमगीर गाझी यांच्या मुबारक कदमांशी नाचीज बंदा गुलाम महम्मद कुलीखान पेशावरी फौजबंद सरलष्कर सरजमीने अफगाण हाली डेरा काबूल याचा सलाम अलेकुम बरकत्तुल्ला-ए-आलई.
हुजुरेपाक खाविंदांनी कृपावंत होऊन गुलामाला अज्ञानाच्या अंधारातून स्वत:च्या मुबारक हातांनी इस्लामच्या नेक राहवर तर आणलेच, शिवाय दयावंत होऊन माझ्यासारख्या नाचीज माणसाची नेमणूक सरजमीने अफगाणच्या मोहिमेवर करून इस्लामची आणि मुघलिया तख्ताची सेवा खिदमत करण्याचा नायाब मौका दिला. त्यानंतर अत्यंत कृपावंत होऊन त्याच मोहिमेच्या सरलष्करीचा सरताज शिरावर चढवून गुलामाचा बहुमान केला. या नाचीज बंद्या गुलामावर मोठाच विश्वास व्यक्त केला.
युसुफजाही पठाणांसारख्या अत्यंत जालीम गनिमांशी झुंजून त्यांना परास्त करणाऱ्या शाही फौजेला शीण आला असेल असे अलीजांना वाटले असावे; त्यामुळे आलाहजरतांनी अत्यंत दयावंत होऊन जनाब-ए-आली महाबतखान साहेबांना मोठ्या शाही फौजेसह आपल्या चरणांपाशी वापस बोलावून घेतले. त्या जागी नवी कुमक येण्याची गुलाम अत्यंत आतुरतेने, चातकासारखी वाट पाहत आहे. रानटी पठाणांशी झुंजून त्यांना नामोहरम करण्यासाठी आणि मुघलिया तख्ताची शानोशोहरत बुलंद करण्यासाठी शाही फौज बेताब असली तरी नवी ताज्या दमाची कुमक आणि पुरेसा खजिना याअभावी गुलाम पूर्ण ताकदीनिशी मोहीम पुढे चालविण्यास असमर्थ ठरला आहे. यासंबंधीचे अनेक अखबार व खलिते गुलामाकडून यापूर्वीच दरबारात पेश झालेले आहेत. परिणामत: मुघलिया साम्राज्याचा विस्तार खैबरपार करण्याच्या आणि इस्लामचा झेंडा बुलंद करण्याच्या कामास मोठीच खीळ बसली आहे. हशम आणि इसम बेकाम, बसून आहेत. सरदार आणि शिपायांचा जोम आणि उत्साह ओसरू लागला आहे; त्यामुळे त्यांना अय्याशीची चटक लागण्याची शक्यता आहे. असेच चालू राहिले, तर ज्यांच्यावर विजय मिळवून ही दौलत कमावली आहे ते रानटी गंवार अफगाणी पठाण त्यांची भूमी मुघलिया तख्ताच्या छायेखालून पुन्हा हिसकावून घेतील; त्यामुळे आलाहजरतांच्या अल्लाच्या पाक साम्राज्याला मोठा धोका उत्पन्न होईल, अशी गुलामाला भीती वाटू लागली आहे. या कारणे त्वरित हालचाली करून हर प्रयत्ने मोहीम नेटाने पु
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा