फॉलोअर

शनिवार, २८ मार्च, २०२०

*नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔**अग्निदिव्य* भाग - 36⃣

*नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜*
*अग्निदिव्य*
*_______📜🗡
भाग - 3⃣6⃣🚩🗡________*

*लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार*

*___🚩📜🚩_______*
*शुद्धीकरणाचा तिथी निश्चय झाला आणि महाराजांची सारी यंत्रणा झडझडून कामाला लागली. गडागडांवर आणि ठाण्यांवर आवतणे पाठवायची होती. विद्वान ब्राह्मणांनाच नव्हे तर रयतेलासुद्धा आमंत्रणे धाडायची होती. निमंत्रणपत्रांचे आणि फर्मानांचे तर्जुमे महाराजांनी स्वत: बाळाजी आवजींना सांगून मनाजोगते लिहवून घेतले. निमंत्रितांच्या याद्या त्यांनी जातीनिशी तपासल्या. जणू पोटच्या पोरीचे लगीन निघावे असा महाराजांचा उत्साह नुसता ओसंडून वाहत होता. कार्यक्रमाच्या बारीकसारीक तपशिलाच्या सूचना ते जातीनिशी देत होते. कार्यक्रमाची भव्य आखणी अन् महाराजांचा ओसंडणारा उत्साह पाहून बाळाजी आवजींना राहावले नाही. तिसरे प्रहरी सदर बसली असताना अखेर त्यांनी विचारलेच–*
महाराज, नेताजीरावांच्या शुद्धीकरणाचा एवढा बडेजाव? एवढा महोत्सव? पूर्वी बजाजी नाईकांचे शुद्धीकरण झाले तेव्हा काही इतका बडेजाव केल्याचे ऐकिवात नाही. मग या खेपेस एवढा उत्सव तो का? मोरोपंतांनी पण विषय निघाल्याबरोबर संधी साधून घेतली–
एवढ्या मोठ्या समारंभास खर्चसुद्धा मोठाच येणार. माझा अंदाज तर सांगतो की, राजघराण्यात आजवर झालेल्या कोणत्याही लग्नसमारंभाच्या कित्येक पटींनी खर्च होईल. किंबहुना राज्याभिषेकासाठी केलेल्या खर्चाच्या खालोखाल या कार्यक्रमाच्या खर्चाचा आकडा जाईल. अनाजी दत्तो हळूच पुटपुटले. असं म्हंता? अबब! अवं येवड्या पैक्यात तर अवघा योक किला नव्यानं बांदुन हुईल. काय? येसाजी कंक आश्चर्य व्यक्त करीत म्हणाले–
बडेजाव जरा अधिकच होतोय एवढे बरीक खरे. मोगलांची नवी स्वारी समोर दिसत असताना वास्तविक अशा खर्चांना आळा हवा. महाराज मंद हसले. त्यात थोडी गमतीची, काहीशी थट्टेची छटा होती. तशीच किंचित विषादाचीही किनार होती. मोरोपंत, अनाजी, आमचा कट्टा शत्रू आलमगीर बादशहा आम्हास जेवढा ओळखून आहे, तेवढे आमच्याच तालमीत तयार झालेले आमचे मुत्सद्दी कारभारी व रणधुरंधर ओळखीत नाहीत हे स्वराज्याचे दुर्दैव आणि आमच्या काळजीचे मोठे कारण आहे. मंडळी, नेताजीकाकांचे आम्ही असेच काही करू, सर्व परंपरा मोडून त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेऊ हा संशय मनी धरूनच त्याने इतकी वर्षे त्यांना दख्खनचा सोडाच, पण हिंदू माणसाचा, संस्कृतीचा वारासुद्धा लागू दिला नव्हता. एवढा मोठा काळ लोटल्यावर नेताजीकाका इस्लाममध्ये पूर्ण मुरले असावेत, मोगली ऐशआरामाला चटावले असावेत आणि आम्हीसुद्धा त्यांचा नाद सोडून देऊन त्यांना विसरलो असू असे त्याला खात्रीलायकपणे वाटले तेव्हाच अगदी निरुपाय झाला म्हणूनच त्याने नेताजीकाकांना दख्खनमध्ये सोडले. असे असताना आमच्या कृतीचे वर्म आणि मर्म आम्हाला आमच्याच माणसांना उलगडून सांगावे लागते.
आता आमचे मेहुणे, बजाजी नाईकांचे शुद्धीकरण करून घेतले तेव्हा आमची ताकद तोकडी होती. परकीय सत्ताधाऱ्यांनाच काय पण आमच्या स्वजनांना आणि रयतेलासुद्धा आमची पुरेशी ओळख नव्हती; त्यामुळे त्या शुद्धीकरणाची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही, जनमनावर त्याचा परिणाम झाला नाही; त्याचे पुन्हा कोठे अनुकरण झाले नाही. आता आम्ही मस्तकी छत्र धरिले आहे. हिंदूंचे स्वतंत्र आणि सार्वभौम सिंहासन निर्माण केले आहे. दक्षिण दिग्विजय केला आहे. गनिमांच्याच काय स्वकीय विरोधकांच्या मनी धाक उत्पन्न केला आहे. प्रत्येक हिंदुमात्र फक्त लुटण्यासाठी, लुबाडण्यासाठी, बाटवण्यासाठीच उत्पन्न झाला आहे, अशी धारणा घेऊन बसलेल्या परकीय सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यांत आम्हाला झणझणीत अंजन घालायचे आहे. एकदा हिंदू बाटवला की, संपले, त्याला परधर्मात राखण्याचे काम हिंदूच नेटाने करतात ही समजूत आम्हाला निपटून काढायची आहे. हिंदू पुन्हा स्वधर्मात येऊ शकतो, आला पाहिजे हे आलम दुनियेला पटवून देणे आम्हाला गरजेचे वाटते. गावोगावी, क्षेत्रांच्या ठिकाणी शुद्धीकरणांचे अनुकरण झाले पाहिजे. घडवून आणले पाहिजे. असे घडले तरच अत्याचारी बाटवाबाटवीस खीळ बसेल. सर्रास परधर्मात जाणारे लोंढे आम्हास थोपवता येतील. स्वधर्मात परतणाऱ्यांचे लोंढे वाढू लागले तर ही परकी कीड या पुण्यभूमीमधून उखडून दूर फेकण्यास विलंब लागणार नाही. आमच्या माता-पितरांनी आणि आम्ही पाहिलेल्या स्वराज्याचे स्वप्न ते हेच आहे. हीच वैदिक हिंदू धर्माची पुनर्स्थापना आहे.
मंडळी, व्यक्तिगत स्तोम वाढवण्यासाठी, स्वत:चे मोठेपण मिरवण्यासाठी किंवा आमच्या वा आईसाहेबांच्या हौसेखातर काही आम्ही राज्याभिषेकाचा एवढा घाट घातला नव्हता हे तर तुम्ही जाणताच. त्या उत्सवाला जो संदर्भ, तोच किंबहुना त्यापेक्षा कांकणभर वरचढ संदर्भ या शुद्धीकरणाच्या सोहळ्याला आहे. नेताजीकाकांचे निमित्त एवढेच. बाळाजी आवजी, या शुद्धीकरणाचे सविस्तर वर्णन करणारी वार्तापत्रे खुद्द आलमगिरापर्यंत जातील याची नीट तजवीज करा. आदिलशहा आणि कुतुबशहांच्या हाती ती जाऊ देत. गनिमांच्या प्रत्येक सुभेदारास, ठाणेदारास ती मिळू देत. जंजिऱ्याचा सिद्दी, मुंबईचे टोपीकर, वसई आणि गोव्याचे फिरंगी, इतकेच नव्हे तर प्रत्येक काझी, पाद्री, परधर्माचा प्रचार-प्रसार करणाऱ्यापर्यंत पोहोचू देत. म्हणजे मग ते बाटवाबाटवी करताना यापुढे दहादा विचार करतील. भारावून गेलेले बाळाजी हळूच म्हणाले–
महाराजांच्या प्रत्येक कृतीमागे केवढा मोठा अर्थ भरलेला असतो! तिला केवढा व्यापक संदर्भ असतो! केवढी ही व्यापक दूरदृष्टी! केवढी अलौकिक प्रज्ञा! म्हणूनच मग रयत त्यांना अवतारी पुरुष समजते. पुरे, पुरे. ही काही आमचे कौतुक करून घेण्याची घडी नव्हे. हजार कामे पडली आहेत. निष्कारण गप्पाटप्पा आता पुरेत.
मंगळवार उजाडला. सकाळी गडाचे दरवाजे उघडल्यापासूनच गडावर माणसांची रीघ लागली. सरदार-दरकदार, मुत्सद्दी, गडकरी, याशिवाय मोठ्या प्रमाणावर रयतसुद्धा हा सोहळा पाहण्यास लोटली होती. गावोगावचे व क्षेत्रोक्षेत्रीचे ब्राह्मणसुद्धा मोठ्या प्रमाणावर गोळा झाले होते. काही उत्सुकतेपोटी, केवळ काय-कसे घडते ते पाहण्यास. काही महाराजांवरील प्रगाढ श्रद्धेपोटी, काही दक्षिणेच्या अभिलाषेने, तर कित्येकजण हा ‘भ्रष्टाकारी पाखंड’ रोखण्यासाठी मुद्दाम गडावर आले होते.
तंबू, डेरे, राहुट्या, शामियाने, मंडप वगैरे उभारून सर्व अभ्यागतांची सोय केली होती. मोठमोठ्या पाकशाळांमधून भोजनाची सोय होती. ब्राह्मणांसाठी सोवळ्याची स्वतंत्र व्यवस्था होती. गडावर एवढी गर्दी झाली असली तरी कोठेही भोंगळपणाला थारा नव्हता. चौकी पहाऱ्यात ढिलाई नव्हती. रयतेला मुक्तद्वार असले, तरी टवाळांना बरोबर चाप लावला जात होता. महाद्वारावरच्या हवालदाराला पाणी पिण्याससुद्धा उसंत नव्हती. येणाऱ्या गर्दीत कोणी परका नजरबाज घुसू नये म्हणून डोळ्यांत तेल घालून लक्ष पुरविले जात होते. किल्लेदार सूर्याजी पिसाळ भल्या पहाटे घोड्यावर स्वार झाले होते; ते थेट सांजवेपावेतो पायउतार झाले नाहीत. या एवढ्या काळापुरती सकाळ-दुपार-सायंकाळ मुजऱ्याच्या रिवाजातून त्यांना महाराजांनी सूट दिली होती. रिवाजापेक्षा अभ्यागतांची सोय आणि गडाची सुरक्षा यांना महाराजांच्या लेखी जास्त महत्त्व होते.
होळीच्या माळावर हिरव्या पोरक्याचा भला मोठा मांडव घालण्यात आला होता. मांडवाच्या मध्यभागी धार्मिक विधींसाठी बरीच मोठी जागा गोमयाने सारवून सिद्ध करण्यात आली होती. त्या जागेच्या बरोबर मधोमध सुशोभित यज्ञकुंड तयार केले गेले होते. पताका, तोरणे, गुढ्या आणि ध्वज लावून मंडप उत्तम रीतीने सजविला होता. यज्ञवेदीच्या पूर्वेकडील अंगास ब्रह्मवृंदाच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पश्चिमेच्या अंगास मानकरी व राणीवशातील स्त्रियांची सोय होती. अन्य दोन्ही बाजू रयतेसाठी खुल्या होत्या. इकडे कार्यक्रमाच्या व्यवस्थांची धामधूम उडाली असतानाच ‘पाखंड’ मोडून काढण्यासाठी आलेल्या मंडळींच्या कारवाया गडावर पाय ठेवल्या क्षणापासून पूर्ण ताकदीनिशी सुरू झाल्या होत्या. किल्लेदाराच्या तुकडीचे त्यांच्यावर पूर्ण लक्ष होते; परंतु जोपर्यंत त्यांच्याकडून कोणताही उपसर्ग होत नाही तोपर्यंत त्यांना अटकाव न करण्याच्या किल्लेदाराच्या सैनिकांना सूचना होत्या. मध्यान्हीच्या सुमारास ब्राह्मणांचा एक मोठा जमाव तावातावाने शास्त्रीमंडळाच्या मुक्कामी पोहोचला. मंडळी भोजनासाठी निघाली होती. ते निवासाच्या पायऱ्या उतरत असतानाच जमाव त्यांची वाट अडवून उभा ठाकला. हडकुळ्या शरीरयष्टीचा एक वयोवृद्ध ब्राह्मण जमावाचे नेतृत्व करीत होता. संतापाने तांबडेलाल झालेले डोळे गरगरा फिरवीत ते वृद्ध शास्त्रीमंडळास उद्देशून म्हणाले–
काय हो, आपणापैकी टोळशास्त्री ते कोण? अहो, गडावर हा जो काही अनाचार चालला आहे त्यास आपण पैठणच्या धर्मसभेचे प्रतिनिधी म्हणून मान्यता दिली आहे, हे सत्य आहे काय? अन् अशा प्रकारचा परस्परव्यवहार करण्याचा तुम्हास अधिकार तो काय? का पैठणच्या धर्मपीठाने आपणास खास परवानापत्र देऊन या अव्यापारेषु व्यापारात सहभागी होण्यास धाडले आहे? त्या ब्राह्मणाचे अत्यंत उद्धट आणि मनामध्ये क्षोभ उत्पन्न करणारे भाषण ऐकूनसुद्धा मनाचा तोल यत्किंचितही ढळू न देता अत्यंत शांतपणे टोळशास्त्री म्हणाले–
मला तरी गडावर कोणत्याही प्रकारचा अनाचार चालू असल्याचे दिसत नाही आहे. कोणत्याही अनाचारास मी व्यक्तिश:सुद्धा कधी संमती देणार नाही; तर मग धर्मसभेचा प्रतिनिधी म्हणून मान्यता देण्याचा प्रश्नच नाही. आपण नेमके कशासंबंधाने बोलत आहात ते स्पष्ट केल्यास बरे होईल. वेड पांघरून संभाविताचा आव आणण्याचे ढोंग पुरे झाले. हेच ते, एका यवनास म्हणे हिंदू धर्मात परत घेण्याचा अनैतिक खटाटोप सुरू आहे आणि त्यासाठी हे एवढे अवडंबर माजविले गेले आहे. रयतेच्या घामाचा राजकोषात जमा झालेला पैसा त्यासाठी उधळला जात आहे.
सनातन वैदिक धर्माचा हा असा अपमान आम्ही कदापि खपवून घेणार नाही. या भ्रष्टाकारास आम्ही प्राणपणाने विरोध करू. जर कोणी हा अनाचार असाच चालू ठेवण्याचा हट्ट धरणार असेल तर त्या भ्रष्टाकारासाठी उभारलेल्या मांडवातच आम्ही आमचा कपाळमोक्ष करून घेऊन, जीव देऊ आणि या ब्रह्महत्येचे पातक स्वत:स ब्राह्मण प्रतिपालक म्हणवून मिरविणाऱ्या तुमच्या राजाच्या माथी बसेल, याची याद राखून ठेवा.
जमावामधील एकेक ब्राह्मण मारे शिरा ताणताणून, आवाज टिपेला नेऊन ओरडत होता. शास्त्रीमंडळी शांतपणे त्यांचा क्रोध पाहत होती. समोरून कोणतेच प्रत्युत्तर येत नाही किंवा साधी प्रतिक्रियासुद्धा प्रकट होत नाही हे पाहून काही वेळाने गदारोळ शांत झाला. पण संतापाने फणफणलेला तो घोळका त्यांची वाट अडवून तसाच उभा होता. मग टोळशास्त्री एक पाऊल पुढे होऊन हात जोडून ब्राह्मणांना सामोरे जात म्हणाले–
भूदेव, आपण समाजपुरुषाचे उत्तमांग, मस्तक. आपल्यासारिख्या सुज्ञांनी असा आततायीपणा करणे शोभनीय नाही. क्रुद्ध जनांचा जमाव जमा करून घेऊन असा वितंडवाद करण्याचा ग्राम्यपणा आपणासारख्यांस शोभत नाही. मध्यान्ह झाली आहे. ब्राह्मण भोजनाच्या पंगती वाढून तयार आहेत. अन्नब्रह्माचा अपमान होऊ देऊ नका. शांत व्हा. प्रथम जठराग्नीस आहुती देऊन त्याससुद्धा शांत करा. या विषयावर आपण सुयोग्य प्रकारे सभा घेऊन, यथास्थित चर्चा करू. तुम्हा सर्वांचे ऐकून घेतले जाईल, मात्र शिष्टाचारास अनुसरून बोलले जाणार असेल तरच; तर्काला धरून व्यक्त होणाऱ्या प्रत्येक शंकेचे निरसन केले जाईल. असे या कार्याचा अध्वर्यू म्हणून मी आपणास वचन देत आहे. सभेचे स्थळ, काळादी तपशील आपणास विदित होतील. निश्चिंत राहावे. प्रथम भोजन करून घ्यावे.
ब्राह्मणांचा तो घोळका अखेर परत फिरला. महाराज दरबारातून परत येताच टोळशास्त्र्यांनी ढेरेशास्त्री व चित्रावशास्त्र्यांना सोबत घेऊन महाराजांची भेट घेतली आणि घडलेला प्रकार त्यांच्या कानी घातला. ब्राह्मणांची ही टोकाची धारणा पाहून महाराज उदास झाले. चर्चेअंती त्यांनी निर्णय घेतला की, बुधवारी, म्हणजे लगेच दुसऱ्याच दिवशी आणि शुद्धीच्या आदल्या दिवशी समारंभासाठी उभारण्यात आलेल्या मांडवातच धर्मसभा भरवायची. महाराजांनी आग्रह धरला की, या सभेत नेहमीच्या प्रथेप्रमाणे केवळ ब्राह्मणच नव्हे तर सर्व जातींच्या मंडळीस सहभागी करून घ्यावे. शुद्धीकरणाचे महत्त्व सर्वसामान्यांच्या मनात बिंबविणे अगत्याचे असल्याने शास्त्रीमंडळाने कोणतीही खळखळ न करता महाराजांच्या योजनेस पुष्टी दिली. त्याच बैठकीत किल्लेदार सूर्याजी पिसाळास बोलावून बुधवारी प्रात:काळी भरणाऱ्या विशेष धर्मसभेची दवंडी देण्याची आज्ञा दिली.
शुद्धीकरणास विरोध करणारी ब्राह्मण मंडळी मुकाट्याने परत फिरली खरी, परंतु ती शांत बसली नाहीत. गडावर आलेल्या अठरापगड लोकांच्या गर्दीत त्यांनी या विषयाची राळ उडविण्यास सुरुवात केली. त्यांचा आक्रमक पवित्रा आणि भडक कोटिक्रम, तसेच तथाकथित धर्मरक्षणासाठी प्राणार्पण करण्याच्या फुशारक्यांनी येर रयत भेदरून गेली. या विरोधकांनी धर्माचा ऱ्हास, भ्रष्टाचार, कलियुगाचा अंत, प्रलय, सर्वनाश वगैरेंचा असा काही बागुलबुवा उभा केला की, सांगता सोय नाही. पुराणातील आणि स्मृतींमधील संदर्भहीन उतारेच्या उतारे उद्धृत करून चालविलेली तर्कटे ऐकून मुळातच द्विधा मन:स्थितीत असणाऱ्या ब्राह्मणांची आणि मराठ्यांची मते विरोधी पक्षीयांकडे झुकू लागली. रात्री उशिरापर्यंत त्यांनी फार मोठा समुदाय आपल्या पक्षाकडे वळवून घेण्यात यश मिळविले.
विरोधकांचा हा धडाका पाहून शास्त्रीमंडळीसुद्धा अस्वस्थ झाली. महाराजांचे ऐकून आपण धर्मसभेचा म्हणून जो निर्णय घेतला, तो योग्य की अयोग्य या संबंधाने ते दोलायमान झाले. जनक्षोभास तोंड देणे काही सोपे नसते. त्यांच्यात अस्वस्थ कुजबुज सुरू झाली. टोळशास्त्र्यांना या अस्वस्थतेची जाणीव झाल्याशिवाय राहिली नाही. या विषयात ते प्रत्यक्ष गागाभट्टांचेच शिष्य असल्याने त्यांची मते अत्यंत परिपक्व आणि ठाम होती. रोज रात्री भोजनोत्तर होणाऱ्या बैठकीत या प्रश्नाचा समाचार घेण्याचे त्यांनी ठरविले होतेच. अपेक्षेप्रमाणे त्या रात्रीच्या बैठकीत काहींनी हा मुद्दा उपस्थित केलाच. यत्किंचितही विचलित न होता टोळशास्त्र्यांनी चर्चेचे स्वागत केले. अत्यंत ठाम आणि आत्मविश्वासपूर्ण रीतीने त्यांनी शास्त्रशुद्ध तर्क, तसेच ब्राह्मणे, उपनिषदे, त्याचप्रमाणे निरनिराळ्या स्मृती व प्रायश्चित्त ग्रंथांमधील उताऱ्यांचे संदर्भासहित दाखले देत, तसेच पूर्वी महाराजांनी विशद केलेला कोटिक्रम इत्यादीचे अतिविस्तृत निरूपण केले. शंकांचे यथोचित निरसन केले. विरोधकांनी चालविलेल्या तर्कटांचा आणि त्यामुळे उभ्या झालेल्या बागुलबुवाचा त्यांनी खरपूस समाचार घेतला; त्यामुळे समस्त शास्त्रीमंडळ पुनश्च पूर्ण आश्वस्त झाले. आपण अंगीकारलेले हे ऐतिहासिक धर्मकृत्य वरकरणी जरी जनसामान्यांच्या प्रचलित विचारांच्या विरोधात वाटत असले तरी तेच अंतिमत: सुयोग्य व हितकर असल्याची त्यांची पूर्ण खात्री पटली. कोणा माथेफिरू दांडगटाकडून कोणास काही उपसर्ग होऊ नये किंवा निवासस्थानावर कोणता अतिप्रसंग होऊ नये याची यथायोग्य काळजी घेण्याची सूचना टोळशास्त्र्यांनी पहाऱ्यावरील शिलेदारांना न विसरता दिली.
होळीच्या माळावर उभारलेला विस्तीर्ण मंडप पहाटेपासूनच खचाखच गर्दीने भरून गेला. लोक मोठ्या आवाजात तावातावाने आपसांत चर्चा करीत असल्याने मांडवात एकच कोलाहल भरून राहिला होता. त्यातच कोणी एखादा अधिक-उणा शब्द काढलाच तर गरम डोक्याची मंडळी हमरीतुमरीवर येत होती. क्वचित कुठे एक-दोन ठिकाणी धक्काबुक्कीचा प्रसंगसुद्धा आला. लोकांना आवरता आवरता मावळ्यांच्या अगदी नाकीनऊ आले. जसजशी सभेची वेळ जवळ येऊ लागली तसतशी अस्वस्थता वाढू लागली. गलका वाढत गेला. ब्राह्मणांचा एक गट तर अगदी हातघाईवरच आला. अखेर हंबीरराव जातीनिशी मंडपात हजर झाले आणि कधी सूचना, तर कधी दरडावणी करू लागले तेव्हा कुठे जमाव आटोक्यात आला. मात्र प्रक्षुब्ध झालेला तो ब्राह्मणांचा गट कोणालाच जुमानेनासा झाला, तेव्हा मोरोपंत पेशवे आणि त्र्यंबक सोनदेवांना हस्तक्षेप करून त्यांना समज देणे भाग पडले. तर फारच चवताळलेल्या एक-दोघांना चौदावे रत्न दाखवून ताळ्यावर आणावे लागले.
घटका भरली आणि मांडवाबाहेर नौबत दुमदुमली. तुताऱ्या निनादल्या. महाराजांच्या आगमनाच्या ललकाऱ्या उठल्या. निरव शांतता पसरली. दमदार पावले टाकत महाराजांनी मांडवात प्रवेश केला. सस्मित चर्येवर धीरगंभीर अन् पूर्ण आत्मविश्वासाचे भाव होते. त्यांच्या मागोमाग शास्त्रीमंडळी प्रवेशली. त्यांच्या गंभीर चेहऱ्यांवर काळजी स्पष्ट दिसत होती. महाराजांच्या साध्याशाच मसनदीशेजारी शास्त्रीमंडळासाठी एका तक्तपोसावर उच्चासनाची सोय केली होती. साऱ्या सभेने महाराजांना उत्थापन दिले. महाराज आणि शास्त्रीमंडळ आपापल्या स्थानी बसल्यानंतरच सभा बसली. महाराजांची करारी नजर चौफेर फिरली आणि अद्याप चुळबुळ करणाऱ्या ब्राह्मणांच्या घोळक्यावर स्थिर झाली. त्या नजरेतील धाक त्यांना जाणवल्याशिवाय राहिला नाही. त्यांची चुळबुळ स्तब्ध झाली. महाराजांनी निराजीरावजींना नजरेनेच इशारा केला. मुजरा घालीत ते सामोरे आले. महाराजांना संमुख होऊन बोलू लागले–
महाराज, मनामध्ये काही हेतू धरून नेताजीराव पालकर गनिमाकडे गेले. परंतु दगा करून, आपण आग्र्याहून प्रयाण करताच आलमगिराने त्यांस अटक केली. दिल्लीत नेऊन आदबखान्यात डांबले. इतकेच नव्हे तर अतोनात छळ मांडला. छळ करून बादशहा आपल्याला जीवे मारल्याशिवाय राहणार नाही व त्यामुळे मनातील हेतू साध्य होणार नाही असे जाणून, कार्यपूर्तीसाठी जीव जगवणे अगत्याचे म्हणून, गनिमी काव्याचा भाग असे म्हणून त्यांनी म्लेंच्छ धर्म स्वीकारला. तरी त्यांच्या मनी स्वधर्म व स्वराज्य यांच्याप्रति निष्ठा आणि श्रद्धा कायम धगधगत राहिली. संधी मिळताच बादशहाच्या कचाट्यातून त्यांनी सुटका करून घेतली आणि ते स्वराज्यात स्वामींच्या पायांशी पावते झाले. स्वधर्म आणि स्वराज्याची सेवा करण्याची त्यांची ऊर्मी प्रखर तेजाने जिवंत आहे असे जाणून स्वामींनी त्यांना अनुकूल कौल दिला आणि धर्मसभेकडून त्यांना शुद्ध करून घेऊन, स्वधर्मात परत आणण्यास मान्यता मिळवली. त्या धर्मसभेच्या निर्णयाप्रमाणे उदईक याच स्थळी नेताजीरावांच्या प्रायश्चित्तपूर्वक शुद्धीकरणाचा विधी होणार आहे. त्यासाठी मुद्दाम आमंत्रणे देऊन रायगडी जनलोक व खाशे मंडळींस पाचारिले आहे. आमंत्रित ब्रह्मवृंदांपैकी काहींना धर्मसभेचा हा निर्णय मान्य नाही. या शुद्धीकरणास त्यांचा सख्त विरोध आहे. हे शुद्धीकरण शास्त्रास असंमत, परिणामी पाखंड माजवणारे असून, ते तत्काळ रद्द करावे अशी त्यांची मागणी आहे. सनातन वैदिक धर्माच्या पावित्र्य रक्षणासाठी त्यांची ही भूमिका असल्याचा दावा ते करीत आहेत. विरोधी मत धारण करणाऱ्यांचे आक्षेप ऐकून घेऊन त्यांस आपली भूमिका विशद करून सांगणे आणि त्यांच्या मागणीचा सांगोपांग विचार होऊन योग्य निर्णय व्हावा या कारणे स्वामींनी प्रस्तुत विशाल धर्मसभेचे आयोजन केले आहे. तरी विरोधी मत धारण करणाऱ्या ब्रह्मवृंदास पूर्वपक्ष करण्यास स्वामींची अनुमती असावी.
नेताजीरावांच्या प्रायश्चित्तपूर्वक शुद्धीकरणाचा निर्णय हा वैदिक संस्कृती, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माच्या अभिवृद्धी आणि संरक्षणासाठीच घेतला गेला आहे. तरीसुद्धा केवळ अज्ञानामुळे ज्यांचा या कृतीस आक्षेप आहे किंवा पोकळ आणि मिथ्या धर्माभिमानाचा आश्रय करून जे प्रत्यक्ष धर्महिताच्याच कृतीस विरोध करीत आहेत किंवा विरोधकांना साहाय्यभूत होणारी भूमिका घेत आहेत त्या समाजाचे अध्वर्यू म्हणवणाऱ्या विद्वान ब्रह्मवृंदास त्यांचा पक्ष मांडण्यास पूर्ण अनुमती आहे. रयतेच्या आणि धर्माच्या हिताचा असला, तरी केवळ दंडशक्तीच्या जोरावर आम्हास रयतेवर कोणताही निर्णय लादावयाचा नाही. मात्र मांडण्यात येणारा तर्क धर्मग्रंथ आणि शास्त्रांच्या आधारेच असावा. पोकळ परंपरा वा रूढींचे अवडंबर माजवणारा नसावा, हे प्रत्येक उपस्थिताने नीट ध्यानी घ्यावे. सभेच्या शिष्टाचारांचा भंग वा बेअदबीचा मुलाहिजा राखला जाणार नाही याचीसुद्धा प्रत्येकाने जाणीव ठेवावी.
महाराजांचे बोलणे संपले आणि त्यासरशी अनेक ब्राह्मण एकदम उठून बोलू लागले. त्या बोलण्याने एकच मोठा कोलाहल उडाला. एकाचेही बोलणे धड ऐकू येईना. मुत्सद्दी, मंत्रिमंडळ आणि शास्त्रीमंडळ महाराजांकडे टकामका पाहू लागले. महाराजांनी तो गोंगाट काही वेळ तसाच चालू दिला. मग मात्र त्यांनी आपला हात उंच उभारून शांत राहण्याची इशारत केली. हळूहळू गलबला शांत झाला. सभामंडपाच्या ज्या भागात कोलाहल करणाऱ्या त्या ब्राह्मणांचा गट बसला होता, तेथे आपली करडी नजर रोखून महाराज बोलू लागले–
ब्राह्मणहो, आपले म्हणणे ऐकून घेण्यासाठी, आमची भूमिका समजावून सांगण्यासाठी, चर्चा करण्यासाठी ही सभा भरवण्यात आली आहे. गोंगाट आणि गलबला म्हणजे आपले म्हणणे मांडणे नव्हे किंवा चर्चा करणे नव्हे. आपणात जे प्रमुख असतील, शास्त्रवेत्ते वा वैदिक विद्वान असतील त्यांनी सर्वांच्या वतीने थोडक्यात शास्त्राधारे जे म्हणणे असेल ते मांडावे. ऐसा गलबला ही धर्मसभेची रीत नव्हे. हे ऐसेच चालणार असेल तर आपणाकडे पूर्वपक्ष नाही असे जाहीर करून सभा बरखास्त करण्यात येईल.
काही वेळ आपसांत कुजबुज झाली. नेत्रपल्लवींचे इशारे झाले. खाणाखुणा झाल्या. मग काही मंडळी एका वृद्ध द्विजवराकडे उठून जाऊन त्यांना काही विनवणी करती झाली. त्यांनी मानेनेच होकार दिला. कपाळी शिवगंध, अंगी भस्माचे पट्टे, गळ्यात, मनगटावर, दंडात रुद्राक्ष माळा, शास्त्री असल्याची खूण प्रकट करणारी मस्तकी शालजोडी गुंडाळलेली, पावित्र्याचे आणि विद्वत्तेचे तेज मुखावर झळकत असलेले, शांत-धीरगंभीर मुद्रेचे ते वयोवृद्ध ब्राह्मण उठून उभे राहिले. शास्त्रीमंडळींस आणि महाराजांस त्यांनी विनम्रपणे नमस्कार केला. मधाने भरलेल्या कास्यपात्राप्रमाणे त्यांचा आवाज अत्यंत शुद्ध आणि कणीदार, श्रवणीय होता, शुद्ध काशाच्या घंटेप्रमाणे नादमय होता.
भो राजन, अइ विद्वांस: श्रेष्ठा: धर्म सागर पारावार परिणा: सकळ भूमण्डळ मण्डणी कृता: वैतण्डिक गण्डस्थळ खण्डनैकहरया: श्रूयताम् तावत्… महाराजांच्या मागे अदबीने उभे असलेले कवींद्र परमानंद हळूच त्यांच्या कानी पुटपुटले– महाराज, गणेशशास्त्री जांभेकर-कुळकर्णी, वेदान्त वागिश, वय्याकरणी, अद्वैत वेदान्ताचे गाढे अधिकारी, काशी क्षेत्री अध्ययन करून शास्त्रीपद प्राप्त केले. खान्देशातून आलेत. हल्ली मुक्काम श्रीक्षेत्र कोल्हापूर…
महाराज हलकेच उद्गारले– अरे वा! एवढे गाढे विद्वान आणि त्यांचा समाचार अद्याप आमचेकडून घेतला गेला नाही? पंत तुम्ही स्वत: ध्यानी ठेवा आणि आम्हाकडून त्यांचा परामर्श घेतला गेल्याशिवाय ते गड उतरणार नाहीत इकडे लक्ष द्या. जी. आज्ञा.
शुद्ध, सुंदर, ओघवत्या संस्कृतात गणेशशास्त्र्यांनी पूर्वपक्ष मांडला. महाराजांनी सहेतुक टोळशास्त्र्यांकडे नजर टाकली. मान लववून शास्त्रीबुवांनी प्रतिसाद दिला आणि उपरणे झटकत उत्तर देण्यासाठी ते उभे राहिले. ते काही बोलण्यास सुरुवात करणार एवढ्यात डोक्याला भले मोठे मुंडासे बांधलेला, मोठमोठ्या गालमिश्या राखलेला प्रौढ वयाचा एक दणकट गडी कंबरेची भली मोठी तलवार सावरीत उभा राहिला. जागेवरूनच महाराजांना मुजरा घालून आपल्या ढाल्या आवाजात तो म्हणाला– मुजरा मायबाप, आमी पवन मावळातल्या बहिरोबाच्या वाडीचं पाटील हावो जी. म्हाराज, ह्ये बामन देव जे काय बोलले त्ये कानास्नी लय ग्वाड वाटलं ह्ये खरं, पर इमानानं सांगावं तर तेतला योक सबुद बी आमा अडान्यांच्या टकुऱ्यात न्हाई शिरला. आमचं राजं गोबामन परतिपालक हाईती आनि जवा त्ये देवा-धरमासाटी कायबाय गोमटं करू म्हन्तात त ही बामनच त्येंना इरोद कराया हुबी ठाकत्यात. आता आमच्या राजाला त्येंचा इरोद कशापाई हाय, त्येंचं म्हननं तरी काय हाय, त्ये जरा आमालाबी समजू द्यात की. का फकस्त आपली बामनंच येक त्येंना की दुसरी द्येवाला उमगनाऱ्या भासत कायबाय बोलनार आन आमी रयत त्येंना नंदीबैलावानी मुंडासं हालवीत ऐकनार. आता ही काय धरम सबा की काय म्हन्तासा तीत आमालाबी आवतन देऊन बोलिवलासा त मग कोनाचं काय म्हननं हाय त्ये जरा आमालाबी उमगू देवा की. मंग आमाला पटलं त व्हय आन नाय पटलं त नाय म्हन्ता येईल. काय मंडळी, म्या म्हन्तो ते बरुबर हाय का न्हाई?
‘खरं हाय, बरुबर हाय, आमालाबी समजलं पायजेल.’ अशा अर्थाचे आवाज रयतेतून मोठ्या प्रमाणावर उमटू लागले. मानकऱ्यांनी पण पाटीलबुवांना पाठिंबा दर्शविणाऱ्या खाणाखुणा केल्या. गोंधळून गेलेल्या टोळशास्त्र्यांनी महाराजांकडे पाहिले. मंद हसून महाराजांनी त्यांना खाली बसण्याचा संकेत दिला आणि हात उंचावत गलका रोखला. सारे शांत झाल्यावर महाराज म्हणाले–
भूदेव, एका अतिमहत्त्वाच्या आणि नजीकच्या ज्ञात भूतकाळात न झालेल्या अशा एका महत्त्वाच्या धर्मनिर्णयावर चर्चा करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने येरांच्या मनात उभ्या राहणाऱ्या शंका निवारण्यासाठी ही धर्मसभा भरवली गेली आहे. एरवी धर्मसभेत विद्वज्जन देव वाणीत पूर्वपक्ष - उत्तरपक्ष करितात, परंतु भूदेव, आजच्या या धर्मसभेत देववाणी न जाणणाऱ्या रयतेचा मोठ्या संख्येने सहभाग आहे. अत्यंत महत्त्वाच्या आणि नाजूक प्रश्नावर काय चर्चा होते आणि कशा प्रकारे काय निर्णय होतो ये विषयी विद्वानांइतुके, आम्हाइतुके येरांससुद्धा स्वारस्य आहे. तेव्हा आपण आत्ता आपले म्हणणे जे देववाणीत मांडलेत तेच सर्वांस समजेल अशा प्रकारे प्राकृतात अर्थात मऱ्हाठीमध्ये मांडावे आणि त्यास शास्त्रीबोवा आपण उत्तरसुद्धा प्राकृतातच द्यावे, अशी आमची सूचना आहे. सूचना यासाठी की, धर्मसभेत धर्माज्ञा दिल्या जाव्यात, राजाज्ञा देण्याचा प्रसंग कोणी येऊ देवो नये. कोणी काही प्रतिक्रिया देण्यापूर्वीच एक प्रौढ ब्राह्मण ताडकन उठून उभा राहिला. घाईघाईत कसाबसा नमस्कार करून उतावीळपणे म्हणाला–
धर्मचर्चेतील शूद्रांस काय समजत्ये? शास्त्रे कशाशी खातात हे तरी त्यांस ठावकी आहे काय? धर्मचर्चेत शूद्रांचा सहभाग म्हणजे तर भ्रष्टाकाराचा कळसच झाला म्हणायचे. ते काही नाही, धर्मसभा म्हटल्यावर धर्मसभा; तिच्या रीतीनेच चालली पाहिजे. वाटल्यास धर्मसभेचे निर्णय शूद्रांस प्राकृतात सांगावेत…
महाराजांची अत्यंत जळजळीत दृष्टी त्याच्यावर स्थिर झाली, त्याबरोबर त्याचे पुढचे शब्द घशातच अडकले. आसपास बसलेल्या लोकांनी हात ओढून त्याला बसते केले. रयतेमधूनसुद्धा काही दांडगे उठून हातवारे करीत तावातावाने काहीबाही बोलू लागले. मावळ्यांनी त्यांना आवरले. थोड्या वेळाने सारे स्थिरस्थावर झाले. मात्र इथे-तिथे थोडी कुणकुण, थोडी कुजबुज होत राहिली. गणेशशास्त्री पुन्हा उठून उभे राहिले. त्यांनी कुजबुज करणाऱ्यांना हाताने थोपवून शांत केले. महाराजांना उद्देशून अत्यंत सौम्य स्वरात ते म्हणाले–
राजन, अशा नाजूक अन् संवेदनशील समस्येचा विचार करीत असता समाजाच्या सर्व स्तरांचा त्यात सहभाग असावा या दृष्टीने आपली सूचना अगदी रास्त आहे. हे जरी खरे असले तरी शास्त्राधारित तत्त्वचर्चेमध्ये काही तांत्रिक आणि पारिभाषिक शब्दांचा वापर अनिवार्य असतो. तद्वतच आपल्या मुद्द्याच्या पुष्ट्यर्थ द्यावी लागणारी उद्धृते आणि उद्धरणे संस्कृतातच द्यावी लागतात; त्यामुळेच हे राजन, धर्मचर्चेत संस्कृत भाषेचा वापर श्रेयस्कर असतो. तद्वतच अन्य प्रांतांच्या, प्रदेशांच्या प्राकृत बोली भिन्न असतात. तेव्हा आसेतू हिमाचल सर्व ब्रह्मवृंदांस व तत्त्ववेत्त्यांस आकलन होणारी संस्कृत हीच ज्ञानभाषा आणि संपर्कभाषा म्हणून अनादी काळापासून मान्यता पावली आहे. म्हणून मग धर्मचर्चा स्वाभाविकच संस्कृतातून केली जाते. दुसरे असे की, सर्वसामान्य रयतेचा सहभाग असणारी धर्मसभा आजवर माझ्या तरी पाहण्यात नाही. या कारणे मी स्वाभाविक आणि प्रचलित सभारीतीस अनुसरून पूर्वपक्ष संस्कृतात मांडला आहे.
गणेशशास्त्री, आपले म्हणणे रास्त असले, तरी सांप्रतची धर्मसभा मराठीतच चालावी असा आमचा आग्रह आहे. पारिभाषिक शब्द व उद्धृते तर संस्कृतात येणारच, त्यास उपाय नाही. कारण सारी शास्त्रे, सारे ज्ञान संस्कृतातच आहे. हजारो वर्षांपासून चालत आलेला तो अखंड प्रवाह आहे. तरी आमचा आग्रह आहे की, जसे जमेल तसे त्यांचासुद्धा मराठीत अनुवाद करून निरूपण व्हावे, ज्यायोगे संस्कृत न जाणणाऱ्यास काही थोडे पदरी पडेल.
हे राजन, प्रवचन वा कीर्तन केल्याप्रमाणे अगदीच प्राथमिक पातळीवर जाऊन धर्मचर्चा करणे तर शक्य नाही. तरीसुद्धा हे प्रजाहितदक्ष राजयोग्या, मी मजकडून होता होईतो सहज ग्राह्य होईल असे प्रतिपादन करण्याचा प्रयत्न करितो मात्र येरांनीसुद्धा मला समजून घेण्याचा प्रयत्न करावा. कधी कोणता मुद्दा फारच क्लिष्ट वाटल्यास, कोणा अधिकाऱ्याने शंका जरूर उपस्थित करावी, मी अधिक सोपे करून सांगण्याचा यत्न करीन; परंतु हे राजन, त्यास मर्यादा असतील तद्वतच या प्रक्रियेस वेळ अधिक लागेल.
‘व्हय. व्हय. चालंल. चालंल. अवं अगदीच काय न्हाय तर अर्धेतर टकुऱ्यात ऱ्हाईल. चालंल ते समद्यास्नी.’ गर्दीतून अशा प्रकारचे आवाज उमटले. मंद हसत महाराजांनीसुद्धा हात उंचावून सहमती दर्शविली. शास्त्रीमंडळींनीसुद्धा मोकळेपणी हसत माना डोलावून त्यास अनुमती दिली. त्यानंतर गणेशशास्त्र्यांनी पुन्हा आपले म्हणणे शक्य तेवढे सोपे करीत रसाळ मराठीत मांडले. त्यांची भाषा प्रासादिक, आर्जवी आणि शैली ओघवती असल्यामुळे तसेच प्रतिपाद्य विषयाचे विवेचन प्रचलित समाजभावना आणि रीतीस अनुसरून असल्याने सर्वसामान्यांस सहजपणे पटणारी होती; त्यामुळे रयतेतूनसुद्धा फार मोठा जनसमुदाय त्यांच्या बोलण्यास कधी माना डोलावून, तर कधी संमतीदर्शक उद्गार काढून पाठिंबा व्यक्त करू लागला.
जांभेकरशास्त्र्यांचा पांडित्यपूर्ण आणि प्रभावी पूर्वपक्ष आणि त्यास असलेला रयतेचा पाठिंबा पाहून शास्त्रीमंडळ अस्वस्थ झाल्याशिवाय राहिले नाही. टोळशास्त्री उत्तरपक्ष करण्यास उभे राहिले. महाराजांनी त्यांच्याकडे पाहून आश्वासक स्मित केले आणि मान डोलावून धीर दिला. शास्त्रीबुवांनी आदल्या रात्री शास्त्रीमंडळींसमोर जे विवेचन केले होते तेच पुन्हा एकदा अधिक विस्तारपूर्वक आणि त्यात अनेक उदाहरणांची व दृष्टान्तांची भर घालून साध्या सोप्या सरळ भाषेत सभेपुढे मांडले. संस्कृतातील उद्धरणांचा केवळ अर्थच नव्हे तर त्यांचा ग्रंथातील नेमका संदर्भ, त्यांची पार्श्वभूमी व त्यांचा समकालीन संदर्भ सोप्या शब्दांत रसाळपणे सांगितला. त्याच्याच जोडीला यापूर्वी महाराजांनी जगदीश्वराच्या मंदिरातील ब्रह्मसभेसमोर जो कोटिक्रम आणि तर्क मांडला होता, तोसुद्धा दैनंदिन जीवनात भोवताली घडणाऱ्या घटनांच्या उदाहरणांची आणि दृष्टान्तांची जोड देत विस्तारपूर्वक मांडला. शुद्धीकरणाची आवश्यकता आणि निकड त्यांनी अगदी तळमळीने मांडली. त्यांच्या वक्तव्यात केवळ पांडित्य नव्हते तर आर्जवी आग्रह होता. केवळ शास्त्रीय तर्क नव्हता तर समाजपुरुषाच्या उन्नतीची, उत्थानाची तळमळ पदोपदी जाणवत होती. विचार अगदी स्पष्ट होते. त्यांचे प्रतिपादन थेट श्रोत्यांच्या काळजाचाच ठाव घेत होते. धर्मांतराच्या संकटाची त्यांनी केलेली विदारक मीमांसा अत्यंत प्रत्ययकारी होती. कारण सभेतील बहुतेक प्रत्येकाच्या कुटुंबास कधीना कधी त्याचा फटका बसला होता. कोणी ना कोणी सगा, सोयरा, स्नेही, परिचित असाच हिरावून घेतला गेला होता; त्यामुळे तर त्यांच्या निवेदनाचा श्रोत्यांवर चांगलाच खोलवर परिणाम झाला. महाराजांच्या मुद्रेवरील संतोष लपून राहू शकत नव्हता. संपूर्ण शांततेने सभा त्यांचे निरूपण ऐकून घेत होती. सुरुवातीस विरोधाचे, असहमतीचे आणि निषेधाचे शेरे उठत होते पण पुढेपुढे संपूर्ण शांततेत, त्यांचे म्हणणे ऐकले जाऊ लागले. बहुसंख्य सर्वसामान्यांस तर त्यांचे म्हणणे पूर्णत: पटले. इतकेच नव्हे तर समंजस प्रज्ञावंतांचा मोठा वर्ग त्यांनी आपल्या वाक्चातुर्याने आपल्या पक्षाकडे वळवून घेतला.
असे असले तरी तथाकथित धर्मनिष्ठ कर्मठ ब्राह्मणांचा एक गट मात्र नर्मदा पाषाणवत आपल्याच भूमिकेस चिकटून होता. टोळशास्त्र्यांचे वक्तव्य संपताच त्या गटातील अनेक व्यक्ती उठून शिरा ताणून, तावातावाने बोलत आपला विरोध व्यक्त करीतच राहिल्या. त्यांच्या बोलण्यात शास्त्रोक्त तर्कापेक्षा तर्कटे आणि आग्रहापेक्षा हटवादच ठासून भरला होता. बहुतेक सारे मुद्दा सोडून भरकटत होते, तर काही भडक भाषा वापरून भावना भडकावण्याचा प्रयत्न करीत होते; धर्मभावनेला आवाहन करण्याच्या नावाखाली धमक्या देत होते. गणेशशास्त्र्यांसारख्या विद्वान मंडळींनी सामंजस्याच्या चार गोष्टी सांगण्याचा व त्यांना आवरण्याचा प्रयत्न करून पाहिला आणि अखेर ते असहाय मुद्रेने त्यांचा तमाशा पाहत गप्प बसून राहिले. शास्त्रीमंडळातून कोणीही एका शब्दाने त्यांना उत्तर देण्याचा, प्रतिवाद करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. ही असली तर्कटे चालू असताना महाराजांनी टोळशास्त्र्यांसह काहींना तसेच निराजीपंत, मोरोपंत, अनाजी दत्तो अशा निवडक मुत्सद्दी मंडळींना समीप बोलावून हलक्या स्वरात काही क्षण चर्चा केली आणि सभेस संबोधित करण्याचा निर्णय घेतला. मंडळी आपापल्या स्थानी परतली व मोरोपंतांनी हस्तक्षेप करून चर्चा थोपविली.
जनहो, वास्तविक श्रीमान टोळशास्त्र्यांनी सर्व शास्त्राधार देऊन यथास्थितपणे शुद्धीकरणाचे समर्थन केले आहे. तरी काही मंडळींचे समाधान झालेले दिसत नाही. हा प्रश्न एवढा अगत्याचा आहे की, महाराजांस त्यास असलेला विरोध पूर्णत: दूर व्हावा असे वाटते. या कारणे महाराज स्वत: या विषयाच्या समर्थनार्थ बोलू इच्छितात. राज्याचे पंतप्रधान या नात्याने आम्ही सर्व उपस्थितांस ताकीद देतो की, महाराजांचा अधिक्षेप करण्याचा, दरबारी रिवाज सोडून बेअदबी करण्याचा प्रयत्न झाल्यास नतीजा बरा होणार नाही.
त्यानंतर महाराजांनी बोलण्यास सुरुवात केली. जगदीश्वराच्या मंदिरात ब्रह्मसभेसमोर त्यांनी जे सांगितले होते आणि टोळशास्त्र्यांनी आपल्या निवेदनात जे मांडले होते तेच त्यांनी पुन्हा एकदा विस्तारपूर्वक व अधिक सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. त्यांच्या मधुर आग्रही बोलण्याची जादू भल्याभल्यांना गुंग करीत असे. तर आधीच भारलेल्या सभेस त्यांनी मंत्रमुग्ध केले नसते तरच नवल! रयतेसोबतच ब्रह्मवृंदांमधून अनुमतीसूचक उद्गार उमटू लागले. महाराजांचे बोलणे संपल्यानंतर कोणी प्रतिवाद करण्यास पुढे येत नसल्याचे पाहून निर्णय देण्यासाठी उभे राहण्याची टोळशास्त्र्यांनी नजरेनेच अनुमती घेतली. एवढ्यात एक दणकट गडी झटक्याने उभा राहिला. जागेवरूनच त्याने मुजरा घातला. आपल्या गडगडाटी आवाजात आणि रांगड्या शैलीत त्याने बोलण्यास सुरुवात केली–
म्हाराज, आमी गुंजन मावळातल्या हुबेवाडीचं पाटील. म्हाराजांनी हाळी द्यावी आन आपुन झोकून द्येयाचं हा आमचा शिरस्ता. आता यो शासतरी द्येव म्हनंल, म्हाराज सोता म्हनंल त्यापरमानं बाटून दूर ग्येलेल्या आपल्या मानसास्नी परत गोत गंगेत आनलं पायजे ह्ये तर अक्षी बावनकशी खरं हाय, पर आमाला थोडकं येगळं म्हनायचं हाय. आमचं म्हननं असं हाय की, सोराज्याशी गद्दारी करनाऱ्याचा गडाच्या टकमक टोकावरून हरहमेश कडेलोट होतुया. अशांना कंदी तोपच्या तोंडी, तर कवा कवा हत्तीच्या पायदळी द्येतात. ग्येलाबाजार बेन हातपाय तरी गमावतोच. पर, म्हाराज चूक आसंल तर पोटी घेवा. ल्हान तोंडी मोटा घास घेतो म्हना, खोटं बोलत आसंन त चाबकानं हाना, पर आमच्यासारक्या इमानदार पाइकांना हितं कायतरी विपरीत हुतंय असं दिसतंया. सोराज्याशी, सोता म्हाराजांशी इतकंच नव्हं तर धरमाशी गद्दारी करनाऱ्यासाटी हा येवडा मोटा बारदाना हुबा क्येला जातुया. काय समजंना झालंया. ‘व्हय, व्हय. बरुबर हाय’ अशा अर्थाचे उद्गार उमटले. महाराजांनी सहेतुक हंबीररावांकडे पाहिले. हंबीरराव पुढे सरसावत म्हणाले–
पाटील, महाराजांच्या न्यायाबद्दल तुम्हाला शंका आहे का? न्हाय जी सरकार, तसं न्हाई. त्ये पाप पदरात घिवून म्या काय नरकाचं धनी व्हवू की काय? पर जिकडंतिकडं कोनी कोनी काय बाय बोलतात. न्हाय न्हाय तो शक शुबा करत्यात. त म्हनलं आपुन थ्येट म्हाराजास्नीच पुसावं. चूक आसंल तर मापी करा मायबाप.
हंबीररावांनी महाराजांकडे पाहिले. महाराजांच्या नजरेची इशारत झाल्यावर ते पुन्हा म्हणाले– ठीक, ठीक. चूक नाही बरेच झाले. निदान रयतेची या संबंधातली धारणा तरी उघड झाली. नेताजीरावांचे गनिमाच्या गोटात जाणे ही गद्दारी नव्हती या विषयी महाराजांनी जातीनिशी खातरजमा करून घेतली आहे. जर नेताजीराव गद्दार असते तर आलमगिराने त्यांस जेरबंद करून दिल्लीत नेले नसते. आदबखान्यात कोंडून त्यांचा जीवघेणा छळ केला नसता. कसेही करावे पण कैदेतून मोकळे व्हावे, म्हणजे मग महाराजांच्या पायाशी स्वराज्यात परतता येईल, स्वराज्याची पुनरपि सेवा करता येईल, ऐसे योजूनच ते मुसलमान झाले. ते गद्दार नव्हते म्हणूनच. तरीसुद्धा बादशहाला त्यांचा विश्वास वाटला नाही. त्यांना दूर अफगाणिस्तानात ठेवले. नाइलाज झाला तेव्हाच दख्खनमध्ये धाडले. एवढा काळ लोटला तरी नेताजीरावांच्या निष्ठा तशाच जिवंत धगधगत्या होत्या. मोगली ढिलाईचा फायदा उठवत संधी मिळताच ते स्वराज्यात परतून महाराजांच्या चरणी रुजू झाले. त्यांच्या इमानाची आणि सचोटीची खातरजमा करून घेतली तेव्हाच महाराजांनी कौल दिला.
हंबीररावांच्या बोलण्याने समाधानाची लहर एका बाजूने उठत असतानाच कृश शरीराचा एक वयोवृद्ध ब्राह्मण ताडकन उठून उभा राहिला. अभिवादनाचे सारे संकेत धुडकावून लावत, तांबडेलाल डोळे गरगरा फिरवीत त्याने तावातावाने बोलण्यास सुरुवात केली.
हे असले शब्दांचे गारुड उभारून तुम्हास या अडाणी शूद्रांना भुलविता येईल कदाचित, परंतु आमच्यासारखे धर्मरक्षक या असल्या भाकड कथांना फसून तुम्हास काय वाट्टेल ते करू देतील असे वाटते की काय? तुम्हास धर्म म्हणजे काय पोरखेळ वाटतो? कोणीही उठावे, काहीही करावे. अरे, ज्ञानेश्वराचे उदाहरण कसले देता, तो प्रत्यक्ष नारायणाचा अवतार होता. तुम्ही काय त्याची बरोबरी करणार? अरे, चार थेंबुटे अंगावर उडवून जर राजा होता आले असते तर नदीत धुतला जाणारा प्रत्येक बैल आणि हेला चक्रवर्ती सम्राट म्हणवता…
तो ब्राह्मण असे बरेच काही बडबडत राहिला. गणेशशास्त्र्यांनी अन् चार सुज्ञांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न करून पाहिला; परंतु परिणाम उलटाच झाला. पाच-सहा ब्राह्मण उठून त्या संतापी ब्राह्मणास साथ देऊ लागले. शांत करू पाहणाऱ्यांनाच अपमानित करू लागले. मंडपातील सारे वातावरण त्यांनी दूषित करून सोडले. लोक अस्वस्थ झाले. ब्राह्मणांचा तो आरडाओरडा, शिवीगाळ ऐकत महाराज बराच काळ स्वस्थ बसून राहिले. जणू राजसूय यज्ञात शिशुपालाचे अपराध मोजणारा योगेश्वरच. मात्र महाराजांचा हा शांतपणा म्हणजे जणू आपला विजयच आहे, असे वाटून ब्राह्मणांचा तो तमाशा जसजसा उग्र होत गेला तसतशी महाराजांची नजर आणि चर्या कठोर होऊ लागली. सोबत मिळाल्याने चेव येऊन अधिकच फणफणणारा तो ब्राह्मण निर्वाणीचे बोलल्याप्रमाणे बोलून गेला– हा म्हणे राजा, म्हणे गोब्राह्मण प्रतिपालक. स्वत:स धर्मरक्षक म्हणवितो, धर्मसंस्थापक म्हणून मिरवितो, ही सभा भरवून त्याने आपण मोठा न्यायी आणि धर्मरक्षक असल्याचा मारे आव आणला आहे. पण जोवरी आमच्या जिवात जीव आहे, तोवरी आम्ही हा भ्रष्टाकार खपवून घेणार नाही. जर कोणाला आपली मनमानी करायचीच असेल, तर त्याच्या मनगटातल्या बळापेक्षा ब्रह्मतेजाचे बळ मोठे आहे हे परत एकदा सिद्ध करून दाखवू. आम्ही धर्मरक्षक ब्राह्मण आत्ता या क्षणी याच स्थानी आपली जीभ हासडून वा कपाळमोक्ष करून प्राणार्पण करू. या ब्रह्महत्येचे पातक राजा म्हणविणाऱ्या या अधम्र्याच्या माथी लागेल हे ब्रह्मवाक्य. खामोश… महाराजांचा संयम संपला. वीज कडाडावी वा आसूड कडकावा तसा त्यांचा आवाज साऱ्या मंडपात घुमला. त्या स्वरातील चीड आणि संतापामुळे मांडवातील खांबन् खांब थरथरला. कनाती शहारल्या. त्या आवाजाने तो अद्वातद्वा बोलणारा ब्राह्मण इतका दचकला की, मटकन खालीच बसला. खामोशऽऽऽ यापुढे एक शब्द जरी उच्चारला तरी कोणताही मुलाहिजा न राखता जिभा कापल्या जातील. आम्ही ब्राह्मणांच्या प्रतिपालनाची प्रतिज्ञा घेतली आहे म्हणूनच इतका उशीर तुमच्या ब्राह्मण्याचा मुलाहिजा बाळगला आणि तुमची बकवास सहन केली. आमची सहनशीलता म्हणजे आमची दुर्बलता, हतबलता समजता की काय? स्वत:ला धर्माचे रक्षणकर्ते म्हणवणारे तुम्ही आज ब्राह्मण म्हणून येथे तोंड चालवीत आहात ते केवळ परमेश्वर कृपेने तुम्हावरी यवनांचा घाला आला नाही म्हणूनच. येथे तुमचा सन्मान होतो म्हणून ही मुजोरी दाखविता? अन्यथा गनिमाकडचा एक मुसलमान शिपाई जरी सामोरी आला तरी श्वानागत दो पायी शेपूट घालून बारावाटा धावता.
स्वराज्य संस्थापना आणि स्वधर्माच्या अभिवृद्धीसाठी आम्ही केवळ तोंडाने वल्गना करीत नाही तर त्यासाठी हाती शस्त्र धरिले आहे. त्याचा धाक आज त्रिखंडी दुमदुमतो आहे. काय युक्त आणि काय अयुक्त हे तुम्हासारख्या पोटार्थींकडून शिकण्याची आम्हास गरज नाही. पाप-पुण्याचा धाक कोणास घालिता? अफजलखान मारिला, त्याचा वकील जातीने ब्राह्मण, पण म्लेंच्छांचे मीठ खाऊन म्लेंच्छांपेक्षा म्लेंच्छ झालेला. त्याने आम्हावरी शस्त्र धरिले. त्याचे तलवारीचे घाव झेलीत आम्ही त्यास विनवीत होतो, आम्हास ब्राह्मणावर शस्त्र चालविणे नाही; परंतु म्लेंच्छ वृत्ती कणाकणांत बाणवून स्वत:च्याच धर्माच्या मुळावर उठलेल्यास त्याचा पाड लागेना. असल्या अधर्म्यांचे ब्राह्मण्य ते कोठले? त्यांच्या ब्राह्मण्यापेक्षा आम्हास स्वराज्याचे रक्षण सहस्रपट अगत्याचे. तेव्हा शस्त्राघाते आम्ही स्वहस्ते ब्राह्मण कापून काढिला. रणांगणी लढताना आमचेच स्वकीय आम्हावरी शस्त्रे उगारून येतात तेव्हा आम्ही काय त्यांस जात-गोत पुसतो की काय? योगेश्वराच्या उपदेशे पार्थाने ब्राह्मण असलेल्या प्रत्यक्ष आपल्या गुरुवरी शस्त्र धरिले. प्राणांहुनी प्रिय आजाचा वध केला. तो काय अधर्म? नव्हे सत्य धर्माच्या रक्षणास्तव ते तर त्यांचे परमकर्तव्य.
अपसमजूत दूर व्हावी, प्रबोधन व्हावे, सामोपचाराने समजवावे म्हणून आम्ही या सभेचा प्रपंच मांडिला. येर रयतेस धर्म कळावा म्हणून धर्मचर्चा मराठीत करविली. या उपरीसुद्धा समजूत पटत नसेल आणि फुकाची आढ्यता संपत नसेल तर समजणाऱ्या भाषेत समजावणी करण्याचाच धर्ममार्ग आम्हापुढे शिल्लक उरतो. तुमच्या आततायी, हटवादी, ब्राह्मण्याच्या रक्षणापरिता स्वधर्माची अभिवृद्धी आम्हास अधिक अगत्याची. मिथ्या धर्मरक्षणाचा तुमचा हट्ट आम्हीच स्वहस्ते पुरवितो. पवित्र धार्मिक विधींसाठी येथे यज्ञवेदी उभारली आहे. त्या कारणे येथे कोणाचे दूषित रक्त सांडणे युक्त नव्हे. त्या कारणे मोक्षप्राप्तीची तुमची इच्छा आम्ही तुम्हास टकमकावरून लोटून देऊन पुरी करवितो. येसाजी कंक, ढालाईत बोलवा आणि या पाचही ब्राह्मणांच्या मुसक्या आवळा. महाराजांचा सात्त्विक संताप पाहून भल्याभल्यांना घाम फुटला. त्यांनी पाच ब्राह्मणांना जेरबंद करून, त्यांचा कडेलोट करण्याची दिलेली आज्ञा ऐकून तर सारी सभा चित्रासारखी तटस्थ झाली. ब्राह्मणांची उर्मट वटवट बंद झाली तरी त्यांच्या मुखावरील मगरुरी कायम होती. मात्र जेव्हा ढालाईतांनी खरोखरच त्यांच्या मुसक्या आवळल्या आणि त्यांना मांडवाबाहेर चालविले, तेव्हा मात्र त्यांचे अवसान गळाले. मग मात्र त्यांनी नुसता आकांत मांडला–
महाराज, दया करा. क्षमा करा. आमची चूक झाली. पदरात घ्या. आमचा जीव वाचवा शास्त्रीमहाराज. या गरीब ब्राह्मणांचा जीव वाचवा. दया करा महाराज, दया करा… झाल्या प्रकाराने अस्वस्थ झालेले गणेशशास्त्री ब्राह्मणांची रदबदली करण्याच्या इराद्याने उभे राहिले असता महाराजांनी हाताच्या इशाऱ्याने त्यांना थोपविले आणि कडक शब्दांत हुकूम सोडला– येसाजी, याच क्षणी यांना नेसत्या वस्त्रानिशी गडाखाली न्या. हातीपायी साखळदंड जखडून यांना तातडीने स्वत:च्या गावी रवाना करा. यांच्याच गावातून यांची गाढवावरून धिंड काढा. चावडीसमोर गाव गोळा करून यांनी केलेल्या तमाशाचा झाडा घ्या. आम्ही गोब्राह्मण प्रतिपालक असलो, तरी धर्मरक्षणाच्या आड येणारी अडाणी आणि हटवादी ब्राह्मणांची खोटी पत्रास या राज्यात राखली जात नाही. राखली जाणार नाही हे जगाला नीट समजू देत. शास्त्रीबुवा उद्याचे विधी ठरल्या मुहूर्तावर, ठरल्या रीतीनेच होतील. आसनावरून ताडकन उठून ताडताड पावले टाकीत महाराज मंडपाबाहेर पडले. सात्त्विक संतापाने त्यांच्या अंगाला थरकाप सुटला होता. हुजऱ्याने पुढे केलेले चढाव पायी चढविण्याचेसुद्धा त्यांना भान राहिले नाही. मोतद्दाराने पुढे आणलेल्या घोडीवर झेप टाकून त्यांनी टाच दिली आणि घोडी चौखूर उधळीत ते महालाकडे निघून गेले.
महाराज दुपारच्या भोजनास निघणार एवढ्यात निराजीपंत आणि कवींद्र परमानंद भेटीला आल्याची वर्दी आली. महाराजांची अनुमती मिळताच दोघे मुजरा करीत महालात प्रवेशले. या पंत. तातडीने असे?
आपल्या आज्ञेप्रमाणे गणेशशास्त्री जांभेकर भेटीसाठी दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत अन्य बारा-पंधरा विद्वानसुद्धा महाराजांच्या दर्शनाच्या इच्छेने आले आहेत. त्यांस सदरेवर थांबवले आहे. आज्ञा झाल्यास भेटीस दाखल होतील. पण हुजऱ्या सांगत होता, स्वामी भोजनास निघत आहेत. तरी भोजनोत्तर भेट घेता येईल. मंडळी सदरेवर थांबतील. नाही. नको. भोजनासारख्या क्षुल्लक सबबीखातर विद्वज्जनांचा खोळंबो नको. त्यांची भोजनेसुद्धा व्हायची असतील. मंडळीस आमच्या खासगी दिवाणखान्यात घेऊन या. आम्ही पोहोचतोच काही पळांत. महाराज दिवाणखान्यात प्रवेशताच उपस्थित ब्राह्मणांनी उत्थापन देत रीतसर नमस्कार केला. महाराजांनी सर्वांचा परिचय करून घेतला. वास्तपुस्त केली. सरतेशेवटी गणेशशास्त्र्यांकडे वळून ते म्हणाले–
गणेशशास्त्री जांभेकर, कुलकर्णी आपण म्हणे मूळ खान्देशीचे, पण सध्या कोल्हापुरी वास्तव्य करून आहात. काय कारणे मूळ वतन सोडून ये देशी येणे झाले? महाराज, आमचे गाव गोधुली, पांझरा नदीचे तीरावर. गाव तसे गावंढेच पण उत्तरेतून येणाऱ्या फौजा तापीपार झाल्या की, आमचे गाव ओलांडूनच दक्षिणेत उतरतात. एकदा फौज आली की, टोळधाडीप्रमाणे सारा विध्वंस होतो. दाणा-वैरण, धान्यधुन्य, गुरेढोरे, तरणे-ताठे पुरुष-स्त्रिया काय काय लुटले जाईल काही सांगता येत नाही. वारंवार येणाऱ्या या विपदेस कंटाळून अखेर करवीर क्षेत्री श्री जगदंबेच्या चरणी आश्रय घेतला.
आपणासारखे व्युत्पन्नच जर निराश होत्साते असा ग्रामत्याग करू लागले तर येरांनी कोणाचा भरवसा धरावा? त्यातून आपण कुलकर्णी म्हणजे सरकारी अधिकारी. आपल्या पश्चात गावचे कुळकर्ण कोणी सांभाळावे? त्याने सरकारी उत्पन्नाची तर हेळसांड होतेच पण गावात जबाबदार अधिकारी नसल्याने गावगुंडांचे फावते. रयत अधिकच त्रस्त होते. असे न होऊ देणे. खान्देशीचा मोठा प्रदेश आता स्वराज्यात आला आहे. श्री कृपेकरून यापुढे असा उपद्रव होणार नाही. मऱ्हाठी फौजांच्या धाकाने उत्तरेतून येणारी दले मार्ग बदलून जातील. आपण स्वग्रामी परतावे. जी. आज्ञा. नव्हे, नव्हे; ही आज्ञा नाही. आमची अशी विनंती आहे. सिंहासनाधीश्वर राजाची इच्छासुद्धा प्रजेने आज्ञा म्हणून उरीशिरी धरिली तरच स्वराज्य सुराज्य होते. वाहव्वा! वाहव्वा!! त्यानंतर महाराजांनी गणेशशास्त्र्यांसह सर्व ब्राह्मणांची यथोचित संभावना केली. त्यांस निरोप देताना महाराज म्हणाले– गणेशशास्त्री, सकाळी सभेत अतिप्रसंग झाला खरा. पण काय करणार? नाइलाज होता. काडीने औषध लावून व्रण बरा करिता येत नाही. त्रास देणारी गळवे कापूनच काढावी लागतात. स्वामींची कृती प्रसंगानुरूपच होती. स्वामींनी दिलगीर होऊ नये. आम्हासोबत आलेली ही मंडळी वस्तुत: त्या प्रकाराबद्दल क्षमा मागण्यासाठीच आली आहेत; परंतु या अशा प्रसन्न वातावरणात अप्रिय विषय कसा काढावा हे न उमगल्याने उगी राहिली. त्या अतिरेकी ग्राम्य प्रकाराबद्दल स्वामींनी विरोधी मत व्यक्त करणाऱ्यांवर नाराज होऊन काही कठोर कारवाई करू नये, अशी प्रार्थना आहे. जवळपास आम्हा साऱ्यांचेच आता मतपरिवर्तन झाले आहे. आजवर आम्ही आम्हास जे शिकविले गेले तेच घोटत गेलो. शास्त्रवचनांचा अर्थ समजला पण त्यांचा असा समाजोन्मुख आशय कधी ध्यानी आलाच नाही. आम्ही आपले ‘धर्मो रक्षति’ याकडेच ध्यान दिले, ‘रक्षित:’ नुसते घोकले पण त्याचा अन्वय आणि आशय ध्यानी घेतला नाही. धर्मरक्षण करितो हे तर त्रिकालबाधित सत्य आहे, पण कोणाचे? तर जो धर्माचे रक्षण करितो त्याचे. हा अन्वय आज ध्यानी आला. तरी अज्ञानमूलक अपराधाला स्वामींनी क्षमा करावी. छे! छे!! अहो क्रोध कसला धरायचा, गैर वागणाऱ्यास शासन झाले. विषय संपला. हे सर्वत्रांस जाणवून देण्यासाठी म्हणून तर आपणास मुद्दाम पाचारिले. आता आमुच्या दोन विनंत्या विद्वज्जनांनी मान्य कराव्यात.
आम्ही राजाज्ञा म्हणूनच त्यांचा आदर करू. पहिली गोष्ट, आपण या सर्व मंडळींसह उद्या होणाऱ्या धर्मकार्यात सक्रिय सहभागी असावे. हा तर आम्ही आमचा बहुमान समजतो. उत्तम! आम्ही टोळशास्त्र्यांकडे तसा सांगावा धाडतो. आपण लगेचच त्यांची गाठ घ्यावी म्हणजे त्यांची अडचण होणार नाही. तद्वतच आपलासुद्धा मरातब राखणे त्यांस सुलभ होईल. अस्तु. दुसरे असे की, यापुढे हा विषय आपणासारख्यांनी जनलोकांत न्यावा. येरांच्या गैरसमजुती दूर कराव्यात. परधर्मात गेलेल्यांस पुनरपि स्वधर्मात आणावे. अवश्य राजन, यापुढे हा विषय आमचे जीवनव्रत होऊन राहील. त्यासंबंधी लोक-जागरण करण्यास आम्ही सर्वशक्तिनिशी कटिबद्ध असू. मात्र… मात्र लोकांस स्वधर्मात आणण्याचा विषय जरा अवघड आहे. तो काय म्हणून? तृषार्ताने कूपाशी जावे. कूपास तर तृषित शोधत हिंडणे शक्य नाही. वास्तव. परंतु व्युत्पन्नांनी कूप वृत्तीने राहू नये. निर्झर होऊन राहावे अशीच आमची प्रार्थना आहे. तथास्तु. *त्यानंतर महाराजांनी ब्रह्मवृंदास अत्यंत सन्मानपूर्वक निरोप दिला.* *_क्रमश:_*
*________📜🚩

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपूर्ण महागाथा मराठाशाहीची भाग १०४

  संपूर्ण महागाथा मराठाशाहीची संग्राहक ::विनोद जाधव भाग १०४ कौं ‍ डिण्यपूर (Kaundinyapur) पोस्तसांभार :: प्रणीता हरड भारतातील एक पुरातत्त्वी...